प्रतिनिधी/ मंडणगड
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून शहराचा वीज पुरवठा खंडित झालेला असल्याने नगर पंचायतीची पाणी वितरणाची सर्व व्यवस्था कोलमडून पडली आहे.
तालुक्यात क्रमांक एकची लोकसंख्या असलेले मंडणगड गाव आहे. डोंगर उतारावर असलेल्या या गावात पाणथळी जमिनीचे क्षेत्र अतिशय कमी आहे. सपाटी गावात केवळ 8 विहिरी असून मे व जून महिन्यातील पाणी टंचाईमुळे त्यांची पाण्याची पातळीही अतिशय खालावून विहिरीन तळ गाठला. त्यातच 6 दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना या तळ गाठलेल्या विहिरींचा आधार घ्यावा लागतो. शहरात सार्वजनिक कुपनलिकांची संख्या अगदी दुहेरी आकडा गाठणार नाही व निवळी नदीही आटलेली आहे. अशा परिस्थितीत लोक पाणी-पाणी करत असताना नगर पंचायत प्रशासनाने केवळ टँकरने शहरातील काही प्रभागात पाणी पुरवठा सुरु केल्याने शहरातील बहुसंख्य प्रभागातील लोक पाणी पुरवठय़ापासून वंचित राहिले आहेत.
महिलांना जेवण करण्यासाठी डोंगराचा अवघड चढ पायी चालत डोक्यावरून दोन -दोन हंडे पाणी मिळवावे लागत आहे. नगर पंचायत मुख्याधिकाऱयांनी केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे शहरास या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची टीका पाणी-पाणी करणाऱया शहरवासियांमधून केली जात आहे. खेड येथील सामाजिक संस्थेने या कामी 64 केव्हीचा जनरेटर विनामोबादला उपलब्ध करुन दिल्याने मंगळवारपासून शहराच्या नळपाणी योजनेस पाणी पुरवठा करणे शक्य होणार असले तरी विविध प्रभागातील मुख्य व उपजलवाहिन्यांची पाणी गळती रोखण्याचे मुख्य आव्हान नगर पंचायत प्रशासनासमोर उभे आहे. टंचाई व आपत्तीच्या काळात हजारो लिटर पाणी गळतीच्या माध्यमातून वाहून जाणे शहरला परवडणारे नाही.
शहरवासीय तीव्र पाणी टंचाईचा सामना करत असताना नगर पंचायत प्रभाग क्र. 8चे नगरसेवक दिनेश लेंडे यांनी आपल्या प्रभागातील सर्व घरांना जनरेटरच्या मदतीने विनामोबदला वीज जोडणी उपलब्ध करुन दिली. त्यामुळे या घरांमधील नागरिकांनी आपल्या कुपनलिकेचा वापर करुन पिण्याचे व वापराचे पाणी मिळवले. अशाच पध्दतीने नागरिक व नगरसेवकांना आपल्या समस्यांवर आपल्या पध्दतीने उपाय शोधावे लागत असतील तर नगर पंचायत प्रशासनाचा डोलारा शासनाने का उभा केला, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.