प्रतिनिधी/ मंडणगड
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आलेले शैक्षणिक साहित्य गेल्या तीन वर्षापासून धुत्रोली उर्दूशाळेच्या समूह साधन केंद्रांत धुळखात पडले आहे. याबाबतची तक्रार तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष रघुनाथ पोस्टुरे यांनी गटविकास अधिकाऱयांकडे सोमवारी केली आहे. याचा तत्काळ पंचनामा करुन संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या तक्रार अर्जात म्हटले आहे की, शाळा शालेय उठावाच्या माध्यमातून ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींना आवाहन करुन शैक्षणिक साहित्य मिळवले जाते, याचवेळे शासनाकडून मिळणारे शैक्षणिक साहित्य तीन वर्षे धुळखात पडले आहे. काही दिवसांपूर्वी शाळांसाठी आलेल्या कपाटांचे शिक्षण विभागास कोणत्याही सूचना न थेट वितरण केले जात आहे. जिल्हा परिषद शाळांमधून सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहे. अधिकारी व कर्मचाऱयांच्या अशा कर्तव्य कसूरतेमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांना सहशालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. क्लिष्ठ विषयांची विद्यार्थ्यांना सोप्या पध्दतीने माहिती मिळावी यासाठी गणित, विज्ञान व इंग्रती विषयाच्या माहिती साहित्याचा यात समावेश आहे.
तीन वर्षापूर्वी शैक्षणिक साहित्याने भरलेले पत्र्याच्या शेकडो माठय़ा पेटय़ा तालुक्यातील शाळांना वितरीत करण्यासाठी शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या. या पेटय़ा शिक्षण विभागाने धुत्रोली उर्दूशाळेच्या परिसरातील रिकाम्या इमारतीत ठेवल्या. मात्र तीन वर्षात वितरीत करण्यात आल्या नाहीत. तालुक्यातील माध्यमकर्मींनी या प्रशालेस शालेय कामकाजाच्या वेळेत भेट दिली असता मुख्याध्यापकांनी पत्रकारांना छायाचित्रे काढण्यास मज्जाव केला. या पेटय़ा कोणी आणून ठेवल्या याविषयी विस्ताराने माहिती दिली. मात्र किती पेटय़ा आल्या याची आपणाकडे नोंद नसल्याचे सांगितले. याचबरोबर तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक त्यांच्या गरजेनुसार धुत्रोली येथून पेटय़ा घेऊन गेल्याची व गेलेल्या पेटय़ांची आपणाकडे नोंद आहे. त्याचे रजिस्टर शिक्षण विभागाच्या कार्यालयात जमा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले असता शिक्षणाधिकारी कामानिमित्त बाहेर गेलेले असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
दोषींवर कडक कारवाई करा- रघुनाथ पोस्टुरे
सार्वजनिक निधीच्या माध्यमातून उपलब्ध शैक्षणिक साहित्य विनावापर सडवून फुकट दवडण्याची शिक्षण विभागाची कार्यपध्दती गंभीर आहे. या संदर्भात गटविकास अधिकाऱयांसह जिल्हा परिषद अध्यक्षांशी फोनवरुन चर्चा केली. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे तक्रारदार पोस्टुरे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.