प्रतिनिधी/ बेळगाव
मंडोळी येथे गवतगंजींना आग लागून शेतकऱयांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला असून सुदैवानेच या घटनेत इतर गवतगंजी बचावल्या आहेत.
मंडोळी येथील शेतकरी शंकर रवळू दळवी आणि बसवंत जयवंत दळवी यांनी जनावरांसाठी गावच्या शेजारीच गंजा रचल्या होत्या. या गंजा जवळूनच वीज वाहिनी तार गेली आहे. शंकर दळवी यांनी चार ट्रक्टर गवत रचले होते. तर बसवंत यांनी दोन ट्रक्टर गवत रचले होते. शनिवारी दुपारी अचानक या गंजींना आग लागल्याचे दिसले. प्रारंभी ती आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र उन्हामुळे आगीने भडका घेतला होता.
या घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाला देण्यात आली. घटनास्थळी बंब दाखल झाला. मात्र तोपर्यंत या दोन गंजी जळून खाक झाल्या होत्या. सुदैवाने यामध्ये इतर गंजी बचावल्या आहेत. या घटनेत शेतकऱयांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आता वाळलेले गवत महाग असल्यामुळे शेतकऱयांना गवत घेणे अवघड जाणार आहे. तेंव्हा या शेतकऱयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.