गळती निवारणाकडे पाणी पुरवठा मंडळाचा कानाडोळा होत असल्याने संताप
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागली असून पाणी गळती निवारणाकडे महापालिका आणि पाणी पुरवठा मंडळाने दुर्लक्ष केले आहे. मंडोळी रोडशेजारी जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी वाया जात आहे. पण सध्या पाणी पुरवठा योजना एल ऍन्ड टी कंपनीकडे सोपविण्यात येणार असल्याने पाणी गळतीची दुरूस्ती कोण करणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
सध्या उन्हाची झळ वाढत चालली असून पाणी टंचाईच्या पर्वास प्रारंभ झाला आहे. ठिकठिकाणी पाणी समस्या भेडसावू लागली आहे. काही भागात पाच दिवसाआड तर काही भागात चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पण काही उपनगरामध्ये अपुरा पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच काही भागातील जलवाहिन्यांना गळती लागल्याने मुबलक पाणी मिळत नसल्याने पाणी समस्या भेडसावत आहे. शहरातील विविध भागातील जलवाहिन्यांना पाणी गळती लागली असून पाणी गळती निवारण करण्याकडे पाणी पुरवठा मंडळाने दुर्लक्ष केले आहे.
नव्याने जलवाहिन्या घालूनही गळती
मंडोळी रोडचे रूंदीकरण करण्यात आले असून या परिसरात नव्याने जलवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. तरीदेखील जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. तसेच नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यासाठी एलऍन्ड कंपनीकडे पाणी पुरवठा विभागाचा कारभार सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे गळती निवारणाकडे पाणी पुरवठा मंडळाने कानाडोळा केला आहे. पण पोटनिवडणुकीमुळे पाणी पुरवठा मंडळाचा कारभार हस्तांतराची प्रक्रिया रखडली आहे. पण सध्या पाणी पुरवठा मंडळाने दुर्लक्ष केले असल्याने गळती निवारणाचे काम कोण करणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. मंडोळी रोडवरील गळतीसह शहर आणि उपनगरातील पाणी गळतीचे निवारण करावे अशी मागणी होत आहे.