पाडव्याचा मुहूर्त चुकला, आता नजरा सोमवारकडे
प्रतिनिधी/ पणजी
निवडणूक निकालानंतर पूर्ण बहुमत मिळूनही तब्बल 15 दिवस भाजपला सरकार स्थापनेसाठी मुहूर्त मिळत नव्हता. आज उद्या करताना एकदाचा तो सोहळा पार पडला. आता त्याचीच पुनरावृत्ती खातेवाटपाबाबत होताना दिसून येत आहे. दि. 28 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र आता खातेवाटपास मुहूर्त मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मंत्रिपद मिळूनही खाते नसल्यामुळे मंत्र्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून प्रत्येकाच्या जीवाला घोर लागली आहे.
प्रत्यक्षात काल गुढीपाडव्याच्या शुभदिनी मंत्र्यांना खाती देण्यात येतील, अशी जोरदार चर्चा होती. परंतु तोही मुहूर्त हुकला आहे. मंत्रिमंडळात अद्याप तीन जागा रिक्त आहेत. त्यासाठी मगोचे दोघे आणि तीन अपक्ष मिळून पाच आमदार दावेदार आहेत. त्यातील तिघांची निवड करताना मुख्यमंत्र्यांची कसोटी लागली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतरच सर्वांना खातेवाटप होईल, अशीही अन्य चर्चा होती.
खात्यांबाबत कमालीची गुप्तता
तरीही खरा विषय मात्र वेगळाच असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची कसोटी केवळ मंत्रिपदासाठी दावेदारांचीच निवड करण्यात लागली आहे, असा विषय नसून खात्यांच्या मागणीवरून मंत्र्यांचे चाललेले बालहट्ट कसे पुरवावे ही विवंचना मुख्यमंत्र्यांना अधिक सतावत असल्याचे समजले आहे. भरीस भाजपचे प्रत्येक महत्त्वाचे निर्णय आता दिल्लीतून होऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यांना प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीश्वरांवरच अवलंबून राहावे लागत आहे. तसेच या निर्णयांबद्दल कमालीची गुप्तताही पाळण्यात येत आहे. आधी मंत्रिपदांबाबत जो प्रकार घडला तोच आता खात्यांबाबतही घडत आहे. त्यामुळेच खातेवाटप लांबणीवर पडत असल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी पणजीत आयोजित कार्यकर्ता सत्कार सोहळ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर मंत्र्यांना खाती देणार असून सोमवारपर्यंत खातेवाटप होईल, असे सांगितले होते. परंतु पाडव्यादिनीही कुणाच्याही पदरात खाते पडले नाही. त्यावरून गुंता अद्याप कायम असल्याच्या चर्चेवर एका अर्थाने शिक्कामोर्तबच झाले आहे.
वजनदार खात्यांसाठी जोरदार चढाओढ
आतील गोटातील माहितीनुसार प्रत्येक मंत्र्याला वजनदार खातेच हवे आहे. खुद्द गृहखाते जे जास्त करून मुख्यमंत्र्यांकडेच असते त्यासाठीसुद्धा रस्सीखेच सुरू असल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय अर्थ, आरोग्य, साबांखा, नगर नियोजन, पर्यटन, वाहतूक यांसारख्या अर्थपूर्ण खात्यांसाठीही जोरदार चढाओढ सुरू आहे. या शर्यतीत मंत्रिमंडळात दोन नंबरचे मंत्री बनलेले विश्वजित राणे, ज्येष्ठतेत सर्वांत अनुभवी असलेले रवी नाईक यांच्यासह बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे, माविन गुदिन्हो, नीलेश काब्राल, आदी बलाढय़ नेते उतरले आहेत. यातील अनेकजण हे गत सरकारातही मंत्री होते. त्यामुळे आपली पूर्वीचीच खाती मिळावी यासाठी ते आग्रही असू शकतात. तसे न झाल्यास मुख्यमंत्र्यांना नाराजी नाटय़ास सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
उद्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
त्याशिवाय सोमवारी होणाऱया मंत्रिमंडळ विस्तारात उर्वरित तिघांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता असलेले मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर हेही आपल्या हक्काच्या खात्यावर दावा करतील, असा अंदाज आहे. सुभाष शिरोडकर तसेच गोविंद गावडे यांनाही त्याच तोलाची खाती द्यावी लागणार आहेत.
सुदिन, आलेक्स फिक्स!
तिसरा कोण? दरम्यान, बहुतेक सोमवारी होणाऱया मंत्रिमंडळ विस्तारात मगोचे सुदिन ढवळीकर, अपक्ष आलेक्स लॉरेन्स आणि तिसरा आमदार एकतर नीळकंठ हळर्णकर किंवा गणेश गावकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा, मांद्रेचे मगो आमदार जीत आरोलकर आणि नावेलीत भाजपचा झेंडा रोवणारे तथा सासष्टीतील एकमेव भाजप आमदार उल्हास तुयेकर यांनाही मंत्रिपदाचे वेध लागले आहेत.