कोणत्याही निर्णयाविना मुख्यमंत्री दिल्लीवरून परतले : तीन-चार दिवसांत निर्णय शक्य
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला आणखी विलंब होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचना करण्यास परवानगी मिळविण्यासाठी बुधवारी सकाळी नवी दिल्ली दौऱयावर गेलेल्या मुख्यमंत्री येडियुराप्पा कोणत्याही ठोस निर्णयाविना रात्री बेंगळूरला परत यावे लागले आहे. भाजप हायकमांडशी भेट झाली तरी येडियुराप्पा यांना त्वरित मंत्रिमंडळ विस्तार नको, दोन-तीन दिवसांनंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडला आहे.
विधानसभा पोटनिवडणूक, विधानपरिषद निवडणूक पार पडल्यानंतर राज्य भाजपमधील अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला आहे. त्यामुळे हायकमांडच्या भेटीसाठी बुधवारी सकाळीच येडियुराप्पा दिल्लीला रवाना झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची येडियुराप्पा यांनी भेट घेऊन 20 मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी जे. पी. नड्डा यांच्याकडे संभाव्य मंत्र्यांची यादी दिली. तथापि, मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत कोणताही निर्णय यावेळी झाला नाही. पुढील दोन-तीन दिवसांत निर्णय कळविण्यात येईल, असे आश्वासन नड्डा यांनी येडियुराप्पांना दिले. त्यामुळे आगामी दिवसांत हायकमांडकडून निर्देश मिळाल्यानंतरच येडियुराप्पा पुढील कार्यवाही करणार आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पा म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार करावा की पुनर्रचना, याबाबत हायकमांड निर्णय घेणार आहे. आपण पक्षाध्यक्षांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ते लवकरच आपला निर्णय कळवणार आहेत.