पक्षातील 7 जणांना संधी देण्याची हायकमांडची सूचना : आयारामांमध्ये कोणाला संधी याचे कुतुहल
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप हायकमांडने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. पण पक्षातील मूळ 7 जणांना संधी द्या. त्यानंतर तुमच्या इच्छेनुसार कोणालाही मंत्रिपदे द्या, अशी सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात भाजप सत्तेवर येण्यास कारणीभूत ठरलेल्या आणि विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या कोणाकोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल याविषयी राजकीय वर्तुळात कुतुहल निर्माण झाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात हायकमांड आडकाठी आणत आहे, असा ठपका येण्यास कारणीभूत ठरू नका. सरकार स्थापनेसाठी सहकार्य केलेल्यांनाही न्याय द्या. आणि याचवेळी पक्षसंघटनेसाठी मेहनत घेतलेल्यांनाही न्याय द्या, असे भाजपश्रेष्ठींनी येडियुराप्पा यांना सांगितले आहे. इतकेच नव्हे; तर तुम्हाला योग्य वाटेल त्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार करा, अशी सल्लाही येडियुराप्पांना देण्यात आला आहे.
काँग्रेस आणि निजद पक्षातून पक्षांतर करून आलेल्या 17 जणांमुळे राज्यात भाजप सत्तेवर आले आहे. त्यांच्यापैकी केवळ 11 जणांना मंत्रिपदे दिल्यास उर्वरितांवर अन्याय केल्यासारखे होईल, अशी भूमिका येडियुराप्पा हायकमांडसमोर पुर्वीपासून मांडत आले आहेत. शेवटी येडियुराप्पांनी किमान 13 जणांना तरी संधी द्यावी, अशी विनंती केली होती. अन्यथा आपल्यावर वचनभ्रष्ट असा ठपका येईल. पक्षांतर करून आलेल्यांपैकी 13 जणांना आणि पक्षातील मूळ 5 आमदारांना मंत्रिपदे देण्याबाबत विचार करता येईल, असा पर्याय येडियुराप्पा यांनी ठेवला होता.
कोणीही बंडखोरी करु नये
परंतु, हायकमांडने त्यांच्या शब्दाला मान्यता दिली नाही. ज्याप्रमाणे पक्षांतर करून आलेले नेते भाजप सत्तेवर येण्यासाठी कारणीभूत ठरले त्याप्रमाणे पक्षातील आमदाराही कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे पक्षातील मूळ 7 आमदारांना मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी सूचना दिली आहे. मंत्रिपदासाठी पात्र असणाऱयांची मोठी फळी पक्षात आहे. त्यापैकी कोणीही मंत्रिमंडळ विस्ताराला आडकाठी किंवा बंडखोरी करू नये, असा सल्ला हायकमांडने दिला आहे.
योग्य समतोल साधणे तुमच्या हातात
पक्षांतर करून आलेल्या सर्वांनाच मंत्रिपदे दिली पाहिजे, असे काही नाही. त्यांची समजूत काढून निगम-महामंडळाचे अध्यक्षपद देण्याबाबत मनपरिवर्तन करा. दीर्घकाळ असमाधानाचे वातावरण राहिल्यास पक्षाच्या स्थिरतेला धक्का पोहोचेल. पक्षात असमाधानाचे वातावरण असताना दुसऱया पक्षातून कितीही जणांना भाजपमध्ये आणल्यास लाभ होणार नाही. त्यामुळे योग्य समतोल साधणे तुमच्या हातात आहे, असा कानमंत्री भाजपश्रेष्ठींनी येडियुराप्पा यांना दिला आहे.