आज सकाळी नव्या मंत्र्यांच्या नावांची घोषणा शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यमंत्रिमंडळ विस्ताराला भाजपश्रेष्ठींनी संमती दर्शविली असून बुधवारी सायंकाळी 5 वाजता नूतन मंत्र्यांचा शपथविधी होणार असून पहिल्या टप्प्यात 24 ते 25 जण मंत्रिपदी शपथबद्ध होणार असल्याचे सुत्रांकडून समजते. नवनियुक्त मुख्यमंत्री बसवराज बोम्माई मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखविण्यात आला. मात्र, याबाबत रात्री उशिरापर्यंत घोषणा करण्यात आली नाही. बुधवारी सकाळीच याबाबत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात किती उपमुख्यमंत्री आणि किती मंत्र्यांचा समावेश असेल, याबाबतचे कुतुहल कायम आहे.
हायकमांडशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बोम्माई रविवारी रात्रीच नवी दिल्लीला गेले होते. सोमवार आणि मंगळवारी त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी सायंकाळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची संसदभवनमध्ये भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. सोमवारी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष, केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली होती.
दोन दिवसात झालेल्या चर्चेवेळी पहिल्या टप्प्यात 24 ते 25 जणांना मंत्रिपदे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. नव्या मंत्रिमंडळात 60 टक्के युवा आमदार आणि 40 टक्के ज्येष्ठ आमदारांना स्थान देण्यास हायकमांडने संमती दर्शविली आहे. तर बी. एस. येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळातील जवळपास 8 जणांना बोम्माईंच्या मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णयही झाल्याचे समजते. प्रादेशिक समतोल आणि विविध समुदायांना प्रतिनिधीत्व या मुद्दय़ांचाही मंत्रिमंडळ विस्तारासाठी विचार करण्यात आल्याचे समजते.
प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी भोजनावळ
केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री राज्यातील भाजप खासदारांसाठी भोजनावळीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मुख्यमंत्री बोम्माई देखील सहभागी झाले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही यावेळी सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोम्माई यांनी राज्यातील रेल्वे योजनांबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
दोन वेळा विमान प्रवास लांबणीवर
वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी 7ः30 वाजता मुख्यमंत्री बोम्माई दिल्लीहून बेंगळूरला परतणार होते. त्यानंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा दिल्लीत मंत्र्यांची यादी घोषित करणार होते. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. दरम्यान, रात्री बोम्माई केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशींच्या दिल्लीतील भोजनावळीत सहभागी झाले. तेथून 9ः15 वाजता ते दिल्लीहून निघून रात्री 11ः45 वाजता बेंगळूरला पोहोचणार होते. मात्र, उशिरापर्यंत ते जोशींच्या निवासस्थानीच होते. त्यामुळे दुसऱयांना त्यांचा विमानप्रवास लांबणीवर पडला.