प्रतिनिधी / विटा
राजकारणात एखादी घटना अशी घडते की कार्यकर्ते थोडेसे विचलीत होतात. त्यासाठीच आज हा मेळावा घेतला आहे. मी स्वाभीमानी कार्यकर्ता आहे. या खेपेस मी मंत्रीपदासाठी इच्छुक होतो ते लपविणारही नाही. मात्र ते नशिबात नव्हते. मंत्रीपदासाठी नाही, तर विकासासाठी संघर्ष करण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले.
आमदार बाबर यांचे राज्य मंत्रीमंडळातून नाव वगळल्यावर कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत होता. या पार्श्वभूमीवर आमदार बाबर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी आमदार बाबर बोलत होते. आटपाडीचे तानाजीराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिनकरदादा पाटील, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, नगरसेवक अमोल बाबर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमदार बाबर म्हणाले, मंत्रीपदासाठी संघर्ष करणाऱयांपैकी मी नाही, संघर्ष करावा लागला तर तो मतदारसंघाच्या विकासासाठी करणार आहे. यासाठी मागे पुढे पाहणार नाही. मी आमदारकीसाठी निवडणूक लढविली होती. मंत्रीपदासाठी लढविली नव्हती. मंत्रीपदासाठी इच्छुक होतो, ते लपवून ठेवणारही नाही. पण नशिबात नव्हते. मला निवडणूकीत शिवसेनेसारखेच भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंडळीनीही सहकार्य केले आहे. त्यांच्याशी बांधील राहणे ही माझी जबाबदारी आहे. मतदारसंघाचा विकास करताना त्यांच्याशी प्रतारणा करणे मला जमणार नाही.
माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या काही संकल्पना आहेत, त्या पुर्ण करायच्या आहेत. उर्वरीत गावांचा टेंभूत समावेश करायचा आहे. वीजेचा प्रश्न आहे, अवकाळीमुळे पिकांचे नुकसान होते, त्यावर मार्ग काढायचा आहे. मंत्री झाल्यावर ही कामे करणे सुकर होते. त्यातच मला अन्य पक्षाच्या लोकांनीही मदत केली आहे. त्यांनाही न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावा लागणार आहे. परंतू आमदार म्हणूनही मी तितकेच ताकदीने काम करणार आहे. मंत्रीपद मिळावे म्हणून शिष्टमंडळाच्या गाडय़ा भरून नेल्या नाहीत. पण प्रसंगी मतदारसंघाच्या विकासासाठी निश्चितच गाडया भरून नेऊ आणि सरकारशी संघर्ष करावा लागला तरी करू, असेही आमदार बाबर म्हणाले.
आज मिडीया आणि सोशल मिडीया इतका तीव्र झाला आहे, की तात्काळ प्रतिक्रिया उमटतात. परंतू माझे मंत्रीपद कोणा एका व्यक्तीमुळे अथवा कोणत्या नेत्यामुळे कापले गेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. सर्व नेत्यांचा मला नेहमीच आशिर्वाद राहिला आहे. कार्यकर्त्यांनी सबुरीने घ्यायला हवे, आपला संघर्ष हा मतदारसंघातील प्रश्नांशी, समस्यांशी आहे. आज मी जी भुमिका मांडतोय ती कदाचित दोन चार महिन्यानी तुम्हाला योग्य वाटेल आणि ती योग्यच असेल. परंतू अतिउत्साहाच्या भरात कोणी टिका टिप्पणी करू नये. मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला, पण अजूनही खातेवाटप झालेले नाही. त्यासाठी होणारा विलंब योग्य नाही, राज्यात अनेक प्रश्न आहेत, कर्जमाफीबाबत देखिल काही आश्वासन दिली होती. मी जानेवारी महिन्यात मतदासंघाचा गावनिहाय दौरा करणार आहे, असेही बाबर यांनी सांगितले.
तानाजी पाटील म्हणाले, मंत्रीपदाचे आश्वासन देवून आम्हाला नादाला लावले आणि मध्यात सोडून दिले, हे बरोबर नाही. एका पक्षातील जबाबदार मंत्री म्हणतो, 288 आमदारांपैकी अनिलभाऊ हे एकमेव कामाचे आहेत. अनेक तरूण आमदार तर प्रत्येक कामाची माहिती घेण्यासाठी भाऊंकडे आल्याचे आम्ही पाहीले आहे. आता कामाचा अनुभव नसणारे हेच तरूण आमदार मंत्री झाले आहेत. सर्वार्थाने मेरीट असणाऱया आमदार बाबर यांना मंत्रपदासाठी डावलले गेले आहे. आमदार बाबर यांना मंत्रीपद मिळाले नसल्याची गोष्ट कार्यकर्त्यांना जिव्हारी लागणारी आहे, नुसते नादाला लावणे बरोबर नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.
यावेळी पंचायत समिती सभापती महावीर शिंदे, माजी सभापती मनीषा बागल, जिल्हा परिषद सदस्या नीलम सकटे, बाजार समिती सभापती चंद्रकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, बाळासाहेब लकडे, उत्तम चोथे, विनोद गुळवणी, सयाजी बाबर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी सभापती विनय भंडारे, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, माजी उपसभापती बाळासो नलवडे, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन सदाशिव हसबे, भरत लेंगरे, तालुकाप्रमुख सतीश निकम, बाजार समिती संचालक सुनील मेटकरी, अनिल हराळे, सुनील गायकवाड, अर्जुन होगले, वैभव म्हेत्रे, शहरप्रमुख राजू जाधव, गार्डीचे सरपंच नेताजी बाबर, उपसरपंच बालाजी बाबर, दिलीप किर्दत, प्रकाश बागल, रामचंद्र भिंगारदेवे, राहुल साळुंखे, ऍड. धनंजय पाटील, बाळासाहेब होनराव, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, बंडू कातुरे, वासुंबेचे माजी उपसरपंच विकास पवार, शशिकांत अदाटे, दिपक माळी, भाळवणीचे माजी सरपंच महेश घोरपडे, गुंडाशेठ जाधव, असलम मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आभार रामचंद्र भिंगारदेवे यांनी मानले.