रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचा आदेश :अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईचे संकेत
प्रतिनिधी /पणजी
पणजीतील रस्त्यांवर एप्रिल मे महिन्यात घातलेले हॉटमिक्सींग 15 दिवसांच्या पावसात वाहून कसे गेले? सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित झाला. त्यांनी संबंधित अभियंत्यांची चांगलीच कानउघडणी केली आणि तातडीने आपल्याला त्यासंदर्भातील अहवाल सादर करा, असे आदेश अभियंत्यांना दिले.
दोन महिन्यांच्या आत रस्त्यावरील हॉटमिक्सींग वाहून गेले आणि रस्त्यांची पणजीत दुर्दशा झाल्याबाबतचे वृत्त दै. ‘तरुण भारत’मध्ये प्रकाशित झाल्याने संतप्त बनलेल्या मंत्री काब्राल यांनी गंभीरपणे त्याची दखल घेतली आणि हा प्रकार कसा झालाच कसा? असा संतप्त सवाल अभियंत्यांना केला. सदर कंत्राटदाराने पुन्हा रस्त्याची दुरुस्ती करुन देतो असे आश्वासन दिल्याचे अभियंत्यांनी मंत्री काब्राल यांच्या कानावर घातल्यानंतर काब्राल यांनी अभियंत्यांची चांगलीच कानउघडणी केली.
हॉटमिक्सींगच्यावेळी कोण अभियंता तिथे उपस्थित होता? कोणी तपासणी केली? डांबराचे प्रमाण किती वापरले होते? दुरुस्त करुन देतो असे तो सांगतो व आपण गप्प बसलात? असेही सवाल मंत्री काब्राल यांनी केले. मुळात हा असा प्रकार झालाच कसा? व आता कोणाला जबाबदार धरायचे? सांगा! असेही मंत्री पुढे म्हणाले. संबंधित अभियंत्यांकडून अहवाल मागितला आहे व आता अधिकाऱयांवर कारवाई तर होणार आहेच शिवाय संबंधित कंत्राटदाराला देखील काळ्य़ा यादीत टाकले जाण्याची शक्यता वाढली आहे.
दै. ‘तरुण भारत’शी बोलताना मंत्री काब्राल यांनी आपण स्वतः जाऊन रस्त्याची पाहणी करणार असे सांगितले.