वार्ताहर / सावईवेरे
वळवई हा प्रियोळ मतदार संघात सर्वात लहान गाव असून प्राधान्यक्रमाने सर्वात जास्त कामे या प्रभागात झालेली आहे. यामागे पंचसदस्यांना गावच्या विकासाची असलेली ओढ आहे. त्यामुळेच गावाचा विकास झपाटय़ाने होत आहे असे प्रतिपादन मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
वळवई येथील गजांतलक्ष्मी देवस्थानच्या शेजारील रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. मंत्री गोविंद गावडे यानी नारळ वाढवून हॉटमिक्स डांबरीकरणाला प्रारंभ केला. यावेळी त्याच्यासमवेत अनुसुचित महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, प्रभारी सरपंच निळकंठ नाईक, पंचसदस्य दिगंबर तारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
सरकार प्रत्येक गावात साधनसुविधा उपलब्ध करून देत आहे. सरकारच्या अनेक सुविधाच्या लाभ घेण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी पंचायतीतर्फे जागृतीची गरज असून वळवई गावात अजूनही विकासकामे करण्याचे उद्दिष्ठ असल्याचे मत मंत्री गावडे यांनी मांडले. त्यासाठी ना हरकत दाखल्याची गरज असून गावच्या विकासासाठी प्रश्न चर्चेने सोडविण्यात येईल असेही त्यांनी शेवटी सांगितले. वळवईचे प्रभारी सरपंच निळकंठ नाईक यांनी स्वागत केले.