मुंबई/प्रतिनिधी
कोरोनाचे भान ठेवत राज्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज अंजिरवाडी येथील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पहिल्यांदा राज्यावरील असणारं कोरोनाचं संकट दूर कर आणि नंतर काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोगही दूर कर, असे साकडे बाप्पाला घातले.
छगन भुजबळ यांनी अंजिरवाडीतील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी भुजबळांनी अंजिरवाडीतील बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. तसेच त्यांनी विरोधकांवर खोचक शब्दात टीकाही केली. यावेळी भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना पहिल्यांदा कोरोना दूर करा. कोरोना दूर झाल्यानंतर काही लोकांच्या मनातील रोग दूर करा. सर्वांना निरोगी करा, शारीरिक आणि मानसिकृष्ट्याही. कोरोनाचा दूर करावा तसे मनामनातले रोगही दूर करावेत असं साकडं मी गणरायांना घातलं आहे, असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान, भुजबळांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. तर काहींनी त्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. गणपतीही आशीर्वाद देतात आणि नियतीही आशीर्वाद देते ती जनतेच्या माध्यमातूनच देते. नियतीने आशीर्वाद दिला. त्यामुळे मला न्याय मिळत चालला आहे. आणखीही न्याय मिळेल, असे भुजबळ म्हणाले. मला दोन प्रकरणात न्याय मिळाला. महाराष्ट्र सदन हे बेसिक आहे. बाकीच्या केसेस या त्याच पायावर उभ्या आहेत. इकडून तिकडून या केसेस तयार केल्या आहेत. आता न्यायदेवतेलाही माहीत झाले आहे. काय आहे आणि काय नाही. त्यामुळे आम्हाला आनंद आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळत आहे, असं ते म्हणाले.