कार्यकर्त्यांना अटक व सुटका, शुक्रवारी मध्यरात्रीची घटना
प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर गोव्यातील ज्या हॉटेलवर राहिले होते, त्या हॉटेलवर जाऊन शुक्रवारी मध्यरात्री निषेध करणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी अटक केली. शनिवारी दुपारी त्यांना जिल्हा न्यायदंडाधिकारीसमोर (एसडीएम) हजर करून त्यांची सुटका करण्यात आली. म्हादईप्रश्नी योग्य भूमिका घेतली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला. मंत्री जावडेकर गोव्यात आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्याची मागणी केली होती. हॉटेल अधिकाऱयांनी त्यांना भेटण्यास मनाई केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेल परिसरातच निषेध व्यक्त करीत धुडगूस घालायला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
कृषी विधेयकसंदर्भात माहिती देण्यासाठी राज्यात
केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकसंदर्भात राज्यातील शेतकऱयांना माहिती देण्यासाठी केंद्रीयमंत्री विविध राज्यात जात आहेत. त्याच अनुषंगाने केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर शुक्रवारी गोव्यात आले होते. मंत्री जावडेकर गोव्यात आल्यानंतर त्यांचे कार्यक्रम कुठे व कधी असतील याबाबत कोणतीही माहिती उघड केली नव्हती. त्यांमुळे त्यांना भेटण्याची अनुमती किवा वेळही कुणाला देण्यात आली नव्हती. मंत्री जावडेकर हे रात्री उशिरा पणजीतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्वरित त्या हॉटेलवर धाव घेतली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमाराची होती.
हॉटेलच्या परिसरातच घोषणाबाजी
गोव्यातील म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळविण्यास मंत्री जावडेकर हे पूर्ण जबाबदार आहेत. त्याबाबत जाब विचारण्यासाठी काँग्रसे कार्यकर्ते मंत्री जावडेकर यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते हॉटेलवर आले होते. मंत्री जावडेकर यांना भेटण्याची अनुमती मागितली असता हॉटेल अधिकाऱयानी त्यांना परवानगी नाकारली. काँग्रेसचे प्रदेश समितीचे उपाध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरातच घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व पणजी पोलीसस्थानकावर आणले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये गोवा प्रदेश युवा काँग्रेस समिती अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, जनार्दन भंडारी तसेच इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
गोव्यातील पर्यावरण नष्ट करण्याचा घाट
काँग्रेस कार्यकर्ते मंत्री जावडेकर यांना भेटून म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविल्या प्रकरणी सरकार गप्प का असा प्रश्न विचारणार होते. गोमंतकीय जनतेचा विरोध असतानाही गोव्यात अनेक पर्यावरणाच्या विरोधात असलेल्या प्रकल्पाना मान्यत देऊन जावडेकर यांनी गोव्यातील पर्यावरण संपुष्टात आणण्याचा घाट घातला आहे. गोव्यातील पर्यावरण नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याला पूर्णपणे मंत्री प्रकाश जावडेकर कारणीभूत असल्याचा आरोप वरद म्हार्दोळकर यांनी केला आहे.
म्हादईचा लढा काँग्रेस कायम लढणार .: दिगंबर कामत
अटक केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्हा न्यायदंडाधिकाऱयांसमोर हजर करून सोडल्यानंतर विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. पत्रकारांशी बोलताना कामत म्हणाले की, म्हादईच्या विषयावर काँग्रेस पक्ष आजही ठाम आहे. कालांतराने म्हादई नदीबाबत इतिहास लिहिला जाईल त्यावेळी काँग्रेस कार्यकत्यांनी केलेल्या कार्याची नोंद त्यात नक्कीच असेल. म्हादईसाठी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत मोठा त्याग केला आहे, असेही कामत म्हणाले. आज म्हादईची परिस्थिती बिकट बनली आहे. दर दिवशी ज्या बातम्या प्रसिद्ध होतात त्या पाहिल्या तर म्हादईचे अस्तित्व गोव्यात राहणार की नाही याबाबत शंकाच आहे, असेही कामत यांनी सांगितले. काही असले तरी म्हादईचा लढा काँग्रेस कायम लढणार, असेही शेवटी कामत यांनी सांगितले.
गोव्यात सध्या ‘जंगल राज’ : गिरीश चोडणकर
गोव्यात सध्या जंगल राज सुरु असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोव्यासंदर्भातील महत्वाच्या प्रश्नासंदर्भात विचारणा करण्यासाठी मंत्री जावडेकर यांची भेट घेण्याची मागणी करून ते वाट पाहत हॉटेलच्या परिसरात थांबले होते. पोलिसांनी त्यांना बळजबरीने ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. गोव्यातील सरकार म्हणजे जंगल राज असून येथे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.