निपाणी
महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निपाणी शहर भाजपाच्या वतीने शुक्रवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, रुग्णांना फळांचे वाटप असे उपक्रम हाती घेण्यात आले होते.
शिवाजीनगर येथे सकाळी सात वाजता स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिम यशस्वी होताच मंत्री शशिकला जोल्ले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यानंतर पंत मंदिर येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष जयवंत भालटे म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले यांचा वाढदिवस निपाणी मतदारसंघासाठी एक लोकसोहळा आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि उर्जा वाढवणारा दिवस आहे. मंत्री जोल्ले वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी परिसरात उपस्थित नसल्या तरी कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा केला आहे, असे सांगितले. यावेळी शहर भाजपाध्यक्ष प्रणव मानवी, एपीएमसी संचालक बंडा घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
गारमेंट कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचा शुभारंभ नगराध्यक्ष जयवंत भाटले, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उद्योजक सुरेश शेट्टी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाचे महत्त्व विषद केले.
याप्रसंगी बोलताना हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. हाच आदर्श कार्यकर्त्यांनी घेऊन वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोना संसर्ग काळात अशा शिबिराची नितांत गरज होती, असे सांगितले. गोपाळ नाईक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. याबरोबरच वाढदिवसानिमित्त येथील रुग्णालयातील रुग्णांना कार्यकर्त्यांकडून फळांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला उद्योजक सुरेश शेट्टी, उपनगराध्यक्ष नीता बागडे, श्रीमंधर देसाई, राज पठाण, दीपक माने, अमित रणदिवे, संदीप वाडकर, नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, विनायक वडे, संतोष माने, आशा टवळे, कावेरी मिरजे, प्रभावती सूर्यवंशी, दीपाली गिरी, अरुण मुदकुडे, प्रभावती सूर्यवंशी, दादाराजे देसाई, दत्ता जोत्रे, दीपक पाटील, उदय नाईक, सोनाली उपाध्ये, विभावरी खांडके, रवी इंगवले, सुनील शेलार, रमेश वैद्य, सुभाष कदम, सागर मिरजे आदी उपस्थित होते.