प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळाने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध शहरांना विमानसेवा सुरू केली आहेच. शिवाय विद्यार्थ्यांसाठी सुलभ प्रवासाची सोय करून दिली आहे. याची दखल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांनी घेतली आहे. त्यांनी छोटी गावे आणि शहरांना विमान वाहतुकीच्या नकाशावर आणण्याचे ‘हवाई चप्पलसे हवाई जहाज’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आरसीएस उडानमुळे कसे प्रत्यक्षात उतरले आहे, यावर एक लेख लिहिला असून त्यात बेळगाव विमानतळाचा उल्लेख केला आहे.
कार्गो विमान वाहतुकीसाठी बेळगाव विमानतळाचा उपयोग केला जात असून लवकरच येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे. उडानने प्रथमच विमान प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी प्रथमदर्जा रेल्वे तिकिटाच्या दरात विमानाचे तिकीट उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर विमान प्रवासाला प्रोत्साहन मिळत असून आर्थिक प्रगती होत आहे.
चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या उडान योजनेमुळे हवाई संपर्क देशाच्या कानाकोपऱयात पोहोचला आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांच्या लेखाचा संदर्भ घेऊन नमूद केले आहे.