प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर येथील गिरिकर्णिका फौंडेशनने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
विवाहबाह्य संबंध ठेवणे न ठेवणे हा खासगी आयुष्याचा आणि नैतिकतेचा प्रश्न आहे, मात्र मंत्री मुंडे निवडणुक उमेदवारी दाखल करताना त्यांनी दिलेल्या शपथपत्रात आपला एकच विवाह झाल्याचे नमूद केले आहे. पत्नी राजश्री आणि मुली वैष्णवी, जान्हवी आणि आदिश्री यांच्या नावांचा उल्लेख त्यात आहे.
तथापि, मंगळवारी त्यांच्या फेसबुक वॉलवर त्यांनी आपले आणखी एका स्त्रीशी वैवाहिक संबंध असून तिच्यापासून दोन अपत्ये झाल्याचा खुलासा केला आहे. निवडणूकीत खोटे अॅफिडेव्हिट सादर करुन इलेक्शन कमिशन आणि मतदारांची दिशाभूल करुन पद मिळवणे हा निश्चितच दंडनीय अपराध आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, असे फौंडेशनचे अध्यक्ष श्री. विजय जाधव यांनी म्हटले आहे.