प्रतिनिधी/ पणजी
भाजप सरकारमध्ये नोकर भरती करताना भ्रष्टाचार होतो. लायक उमेदवारांना बाजूला ठेवून लाखो रुपये खाऊन बेकायदेशीर भरती केली जाते हे न्यायालयीन निकालातून स्पष्ट झाले आहे. तोच मोठा पुरावा असल्याने तत्कालीन वीजमंत्री व आताचे नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. ते राजीनामा देत नसतील तर त्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उचलबांगडी करावी, एवढेच नव्हे तर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात यावा असेही पक्षातर्फे नमूद करण्यात आले आहे.
पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या कायदा विभागाचे अध्यक्ष अल्वारिस परेरा व युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी वीज खात्यातील 32 डेटा एंट्री ऑपरेटर्सची भरती न्यायालयाने रद्दबातल ठरवल्याने भाजपाचा भ्रष्टाचार उघडा पडला आहे, असे सांगितले.
मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा
हा भ्रष्टाचार झाला त्यावेळी मंत्री नाईक यांनी हे वीजमंत्री होते. त्यांच्या काळात सदर नोकर भरती झाली होती. ती पदे रु. 10 ते 15 लाखांना विकण्यात आली, असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गाने नोकऱया देणे हा गुन्हा असून त्यास नाईक हे जबाबदार आहेत. त्यांची जबाबदारी घेऊन मंत्री नाईक यांनी त्वरित पायउतार व्हावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
अशा प्रकारे जर नोकऱया विकण्यात येत असतील तर गोवा कर्मचारी निवड आयोग- लोकसेवा आयोग यांची गरज नाही. ते आयोग त्वरित रद्द करा, आवि सर्व नोकऱया भाजप कार्यकर्त्यांना द्या, असा टोमणा काँग्रेस पक्षाने भाजपला मारला आहे.
सरकारतर्फे आता 10,000 नोकऱयांची भरती केली जाणार आहे. त्या सर्व नोकऱया बेकायदेशीर मार्गाने भ्रष्टाचार करुन पैसे खावून देण्याचा धोका संभवतो असेही काँग्रेस पक्षाने निदर्शनास आणले आहे. या प्रकरणी आरटीआय अंतर्गत माहिती मागण्यात आली होती. परंतु ती देण्यात आली नसल्याचा आरोप काँग्रेसवर केला आहे.