ऑनलाईन टीम / अमरावती :
वाहन अडवून कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्या प्रकरणी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह 24 मार्च रोजी दुपारच्या वेळेस वाहनांसाठी एकेरी असलेल्या मार्गाने जात होत्या. हा प्रकार निदर्शनास आल्यावर वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवले आणि हा एकेरी मार्ग असल्याचे सांगून त्यांनी वाहन घेऊन जाण्यास चालकास मनाई केली. त्यावर यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर कार्यकर्ते शरद जवंजाळ आणि राजू इंगळे वाहनातून खाली उतरून उल्हासराव वराळे यांच्यासोबत वाद घातला. व त्याला मारहाण केली. या प्रकरणी वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास : यशोमती ठाकूर
त्यातच आता भाजपने यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्या म्हणाल्या, याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता एका महिलेमागे संपूर्ण भाजप लागणार. भाजप आणि आमच्यात विचारांची लढाई आहे. पण त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तरी विचारांची लढाई आम्ही लढत राहणार, असे सांगत माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळणार असा विश्सास देखील त्यांनी याठिकाणी व्यक्त केला.