कोल्हापूर/प्रतिनिधी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपानं सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. आज (शनिवारी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाहीतर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांच्या वतीने दिला आहे.
संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलताना “मुख्यमंत्री सत्यवादी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही” असं म्हटलं होतं. त्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. पण ते या मुद्द्यावरून दिसून येत नाही. दरम्यान ते प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात ते दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी आहे. त्यामुळे संजय राऊतांना ते सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही.” असे पाटील म्हणाले.