कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील–यड्रावकर यांनी सोमवारी आयोजित केलेल्या लोकशाही दिनास चांगला प्रतिसाद मिळाला. या लोकशाही दिनास हजारो नागरिकांनी उपस्थिती लावत आपली गाऱ्हाणी मांडली. 1 तासात 309 तक्रारी दाखल झाल्या.
बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, महापालिकेकडून बांधकाम करण्याची अट शिथिल कराव्यात, आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करावी, गावातील रस्ते प्रश्न यासह अन्य प्रश्न ग्रामस्थांनी, नागरिकांनी मंत्र्यांसमोर मांडली. यावेळी मंत्री महोदयांनी काही प्रश्नावर तात्काळ आदेश देऊन हे प्रश्न निर्गत केले. तर काही अडचणीच्या प्रश्नावर एक महिन्यात किंवा पुढील लोकशाही दिनात निर्णय घेण्यात येईल किंवा यासंबंधीची माहिती एसएमएसद्वारे आपल्याला कळवू असे सांगण्यात आले.
या लोकशाही दिनास जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.