प्रतिनिधी / कोल्हापूर
साहेब, कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी गेल्या चार वर्षापासून महावितरणचे उंबरठे झिजवतोय. पण अद्याप जोडणी मिळालेली नाही. बिल्डरकडून घर खरेदी केले आहे. पण तो खरेदी पत्र करुन देत नाही. साहेब मला पेन्शन मिळत नाही अशा अनेक तक्रारींचा पाऊस पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकामंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थिती सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात पडला. सुमारे 900 हून अधिक तक्रारवजा निवेदने यावेळी मंत्र्यांना देण्यात आली. प्रशासनाच्यावतीने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन होत असून देखील मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच लोकशाही दिनात एवढय़ा तक्रारी वाढल्या कशा ? प्रशासन व्यवस्था कार्यक्षम नाही का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
शासकिय विश्रामगृहामध्ये राजर्षी शाहू सभागृहात सोमवारी (3 रोजी) दुपारी बारा वाजता जिह्यातील तिनही मंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लोकशाही दिनास सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, मनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने यांच्यासह जिल्हा परिषद, महानगरपालिका, महावितरण, पाटबंधारे, आदी सर्व विभागांतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे 900 तक्रारअर्ज मंत्र्यांकडे देण्यात आले.
मंत्र्यांकडून आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेने सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासूनच नागरीकांनी मोठय़ा संख्येने शासकीय विश्रामगृहामध्ये मोठी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता तक्रारअर्ज स्कारण्यास सुरुवात झाली. तक्रारदारांची संख्या जास्त असल्यामुळे पोलीसांनी तक्रारदारांना एका रांगेत सोडले. त्यामुळे विश्रामगृहाबाहेर सुमारे दोनशे फुटांची रांग दिसत होती. सुरुवातीस प्रशासनाकडील छापील अर्ज घेऊन त्यावरती स्वतःचे नाव, पत्ता, ज्या विभागाबाबत तक्रार अथवा काम आहे त्याचे नाव, यापूर्वी तालुका लोकशाही दिनात तक्रार केली आहे काय ? याबाबत माहिती. तक्रार केली असल्यास त्याचे स्वरूप आणि तहसिलदारांकडून मिळालेले उत्तर आदी बाबीच्या माहितीचा अर्ज टोकनसह मंत्र्यांकडे देण्यात आले. त्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱयांनी या तक्रारींची विभागनिहाय वर्गवारी केली. येत्या दोन दिवसात या सर्व तक्रारी संबंधित विभागाकडे देण्यात येणार आहेत. ज्या तक्रारी योग्य आणि स्थानिक पातळीवरील आहेत, त्यांची महिन्याभरात निर्गत केली जाणार आहेत. तर ज्या तक्रारी जिल्हा पातळीवर निर्गत होण्यासारख्या नाहीत, त्याबाबत तक्रारदारांन लेखी स्वरुपात कळवले जाणार असून तक्रार प्राप्त झाल्याचा मेसेज तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावरती पाठवला जाणार आहे.
पाच वर्षे महसूलमंत्री पद असताना प्रश्न का सुटले नाही ?
मंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर बहुतांशी नागरिकांकडून साहेब, माझ्या तक्रारीवर तत्काळ मार्ग काढून न्याय द्या,अशी मागणी केली जात होती. यावेळी एका तक्रारदाराला उद्देशून मंत्री सतेज पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे जिह्यात दुसऱया क्रमांकाचे महसूलमंत्री पद होते. तरीही जिह्यातील प्रश्न का सुटले नाहीत, अशी विचारणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. आमचे सरकार येऊन एक महिना झाला आहे. त्यामुळे आम्हाला वेळ द्या.सर्वांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.
प्राधिकरणबाबत पुढील आठवडय़ात बैठक
लोकशाही दिनामध्ये प्राधिकरणाबाबत अनेक तक्रारअर्ज दाखल झाले. यावेळी प्राधिकरणामध्ये समाविष्ठ असलेल्या शहरालगतच्या 42 गावांतील ग्रामपंचायत सदस्य आणि प्राधिकरणच्या अधिकाऱयांची पुढील आठवडय़ात बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.