बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अशा अयोध्येतील श्रीराम मंदिराचा भूमीपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला पार पडला. येत्या 3-4 वर्षात मंदिर बांधून पूर्णपण होईल. वैदिक परंपरेमध्ये मंदिर हे केवळ श्रद्धास्थान किंवा प्रेक्षणीय स्थळ नाही तर जीवनाला मार्गदर्शन देणारी विद्यालये आहेत. अनेक वैदिक शास्त्रांमध्ये मंदिर कशासाठी असते याचे वर्णन आहे. श्रीमद् भागवतमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण मंदिरामध्ये काय करावे याबद्दल आपला भक्त उद्धवाला सांगताना म्हणतात, “प्रिय उद्धव, मंदिरातील पुढील कार्यक्रमात भाग घेऊन भक्त अहंकार आणि प्रतिष्ठेची लालसा त्यागू शकतो. मनुष्य माझ्या विग्रहाचे (मूर्तीचे) तसेच माझ्या शुद्ध भक्ताचे दर्शन, पूजन, गुणगान, त्यांचा स्पर्श, त्यांची सेवा आणि त्यांना प्रणाम अर्पण करून स्वतःला शुद्ध करू शकतो. मनुष्याने माझ्या दिव्य गुणकर्माचे महिमागान करावे तसेच प्रेम आणि श्रद्धापूर्वक माझ्या गौरवगाथांचे श्रवण करावे, त्याने सतत माझे ध्यान करावे, त्याने जे काही प्राप्त होते ते सर्व मला अर्पण करावे आणि स्वतःला नित्य दास मानून सर्वथा मला शरण यावे. माझा जन्म, लीला इत्यादींची सतत चर्चा करावी. जन्माष्टमी, रामनवमीसारख्या सोहळय़ात सहभागी होऊन जीवनाचा आनंद घ्यावा. गायन, नृत्य, वादन इत्यादींसह माझ्या मंदिरात सण सोहळे साजरे करणे. उत्सव, तीर्थाटन आणि पूजेसह सर्व वार्षिक सण साजरे करणे. एकादशी व्रताचे पालन करणे, वेदविहित मंत्र दीक्षा स्वीकारणे, व्यक्तिशः अथवा सामूहिकरीत्या राधाकृष्ण, सीता राम, विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करणे आणि त्यात माझ्या विग्रह (मूर्ती) प्रति÷ापनेत श्रद्धेने सहभागी होणे. मंदिरासहित नगरे, फुलोद्यान, फलोद्यान आणि लीलास्थळांची स्थापना करणे. स्वतःला नम्र सेवक मानून माझे निवासस्थान असणाऱया मंदिराचे दंभरहित होऊन मार्जन करणे. सर्व केरकचरा काढून झाल्यावर जल आणि गोमूत्र शिंपडून मंदिर शुद्ध करणे. ते सुकल्यानंतर सुगंधी जल फवारून विविध प्रकारच्या रांगोळय़ा काढणे. तसेच भक्तांनी आपल्या भक्तीचा गौरव कधी करू नये जेणेकरून त्याला सेवेचा वृथा अभिमान होणार नाही. भक्तांनी या जगातील अति प्रिय गोष्ट किंवा स्वतःला अति प्रिय वाटणारी वस्तू मला अर्पण करावी. असे करणारा मनुष्य शाश्वत जीवनासाठी प्राप्त होतो.’’
भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये स्पष्ट केले आहे की त्यांना पूर्ण शरणागत होणे आणि त्यांचा शुद्ध भक्त होणे हेच मानवी जीवनाचे एकमेव आणि अंतिम ध्येय आहे. वरील वर्णनामध्ये त्या भक्तिमय सेवेच्या प्रक्रियेचे वर्णन केले आहे. अशी भक्तिमय सेवा करणे आणि कशी करावी याचे सर्व समाजाला शिक्षण देणे हा मंदिर स्थापनेचा खरा उद्देश आहे.
मंदिरामध्ये काय प्राप्त करावे याचे थोडक्मयात वर्णन पुढीलप्रमाणे करता येईल.
दिव्य ज्ञान प्राप्ती : मंदिर एका विद्यालयाप्रमाणे आहे, जेथे प्रशिक्षित भक्ताद्वारे गीता, भागवत, महाभारत, रामायणसारख्या आध्यात्मिक ग्रंथांचे ज्ञान आणि प्रशिक्षण दिले जाते. आजच्या शिक्षणप्रणालीमध्ये जीवनाशी निगडित काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत नाहीत. उदाहरणार्थ मी कोण आहे?, मृत्यूनंतर काय होते? सृष्टीची उत्पत्ती कशी कोणत्या कारणासाठी झाली? परमेश्वर, भगवान कोण आहेत?, धर्म काय आहे?, आपला भगवंताशी संबंध काय? भगवंत आहेत तर आपल्याला चांगले कर्म करूनसुद्धा आयुष्यात अनपेक्षित दु:खे का येतात? अशा अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे मंदिरामध्ये आपल्याला प्राप्त होतात. म्हणून तर मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर प्रथा आहे की थोडा वेळ बसावे, जेणेकरून तेथून प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला काही तरी शिकता यावे.
स्वास्थ प्राप्ती :जेव्हा आपले शारीरिक स्वास्थ ठीक नसते त्यावेळी आपण दवाखान्यात जातो, त्याचप्रमाणे मंदिर हे मनाचे स्वास्थ ठीक करणारे ठिकाण आहे. आमच्या मनाला काम, क्रोध, मद, लोभ, मोह आणि मत्सर इत्यादी व्याधीपासून मुक्त करण्याचे औषध मंदिरामध्ये मिळते. मन: त्रयते इति मंत्र: अर्थात मनाला मुक्त करण्याचे साधन म्हणजे मंत्र, याचे ज्ञान प्रात्यक्षिकासहित मंदिरात प्राप्त होते.
प्रेम प्राप्ती : भगवान श्रीकृष्ण आपले परम पिता आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात अहं बीजप्रद: पिता अर्थात मी बीज प्रदान करणारा सर्व जीवांचा पिता आहे. हेच सत्य तुकाराम महाराज कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता या अभंगात सांगतात. मंदिरामध्ये येणे म्हणजे आपला परमपिता श्रीकृष्ण, श्रीराम यांच्याकडे प्रेमाची देवाण घेवाण करण्यासाठी येणे. आपला व भगवंताचा सनातन संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पवित्र हरिनामाचा जप करण्यासाठी शिकणे, श्रीमूर्तीचे दर्शन करणे, भगवंताच्या दिव्य कथा ऐकणे, भगवत प्रसाद ग्रहण करणे आणि भगवंताची तन मन धन अर्पण करून मनःपूर्वक सेवा करणे.
घर एक मंदिर
वरील सर्व शिक्षण मंदिरामध्ये घेऊन आपल्या घरामध्ये सुद्धा मंदिरासारखे पवित्र वातावरण निर्माण करणे हा मंदिरामध्ये जाण्याचा खरा उद्देश आहे. प्रत्येकाने आपापल्या घरी सकाळ संध्याकाळ भगवद्गीता, भागवत, महाभारत, रामायणसारख्या जीवनाला दिशा देणाऱया पवित्र ग्रंथांचे वाचन करावे. हे ग्रंथ खरे मार्गदर्शक आहेत. कौटुंबिक स्वास्थ ठीक राहण्यासाठी हरिनामाचा जप करावा. कलियुगामध्ये हरे कृष्ण महामंत्र जप करणे हा युगधर्म आहे. घरातील सर्व सदस्यांनी या पवित्र नामाचा जप करावा. भगवंताच्या मूर्तीची म्हणजे राधा-कृष्ण, सीता-राम, विठ्ठल रुक्मिणी यांची घरामध्ये स्थापना करावी. भगवंतांना नेवैद्य अर्पण करून मगच प्रसाद ग्रहण करावा. दुर्दैवाने आज आपल्या घरातील भगवंताची जागा टी.व्ही.ने घेतली आहे. आपल्या दुर्लभ मनुष्यजीवनातील अमूल्य वेळ आपण टी.व्ही.समोर बसून वाया घालवत आहोत परंतु हेच आपल्या मानसिक अस्वस्थतेचे कारण आहे. सारांशाने सांगायचे झाले तर श्रीराम मंदिरापासून प्रेरणा घेऊन आपले घरपण राम मंदिर बनवावे. आपल्या हृदयमंदिरात श्रीरामांना स्थान द्यावे म्हणजे सर्व अनर्थ आपोआपच विनासायास दूर होतील. प्रत्येकाने आपापल्या घरात राम मंदिर निर्माण करून वर वर्णन केल्याप्रमाणे सेवा केल्यास निश्चितच ‘रामराज्य’ निर्माण होईल. नाहीतर ‘मंदिर वही बनायेंगे, हम मनमानी करते रहेंगे’ असे केल्यास श्रीराम मंदिर केवळ एक प्रेक्षणीय वास्तू म्हणून उभी राहील. मंदिर निर्माणाचा खरा हेतू ‘रामराज्य’चे आपले पूर्वजांचे स्वप्न अधुरेच
राहील. लाखो लोकांनी बलिदान, त्याग केल्यामुळेच आता भव्य राम मंदिर उभारले जाणार आहे याची जाणीव ठेवून खऱया अर्थाने रामभक्त होण्याचा आपण सर्वानी प्रयत्न करुया.
वृंदावनदास