ऑनलाईन टीम / पुणे :
भारतीय जनता पार्टीकडून आज संपूर्ण राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातही कसबा गणपतीच्या मंदिराच्याबाहेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंखनाद आंदोलनात भाग घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, मंदिरे पूर्णपणे बंद ठेवणे हे चुकीचे आहे. नियम करुन द्या. एकावेळी दहाच जण आत जातील, ते बाहेर आल्याशिवाय पुढचे दहा आत जाणार नाहीत, मास्क, सॅनिटायझर असे नियम करा. पण मंदिरे आता बंद ठेवू नका. मंदिरे फक्त श्रद्धेचा प्रश्न नव्हे तर रोजगाराचा स्त्राsतही आहेत. मंदिराबाहेरच्या दुकानावर अनेक संसार चालतात. त्यांचे काय? जर सरकार मंदिरे सुरू करणार नसतील तर आम्हालाच मंदिरे सुरू करावी लागतील. आजपासून लोक भावना दाबून ठेवणार नाहीत. कुलूप तोडून लोक मंदिरे खुली करतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला आहे.
- उद्धवजी होश मे आओ, होश मे आकर बात करो..,
पुढे ते म्हणाले, उद्धवजी होश मे आओ, होश मे आकर बात करो, महाराष्ट्रातील पाच पंचवीस लाख लोकं असतील ते देव मान नाहीत. पण मंदिर सुरू न करता इतरांचे शाप तुम्ही घ्याल. आज संध्याकाळपर्यंत मंदिर सुरू करा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले. तसेच ‘दोन वर्ष वारी नाही म्हणजे काय? वारकऱ्यांना विचारा. आज संपूर्ण महाराष्ट्रात शंखनाद आंदोलन सुरु आहे. चारचाकी गाडीतून थेट मंदिरात जाऊन पूजा करणाऱयांना वारकऱयांच्या भावना काय कळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.