फोंडा वन्यजीव विभागाकडून 38 मगरींची सुटका
प्रतिनिधी / फोंडा
एका बाजूला पर्यावरणीय साखळीतील विविध प्राण्यांची संख्या घटत चाललेली असताना, दुसरीकडे मगरीसारखे उभयचर प्राणी वाढत आहेत. सर्प, अजगर, बिबटय़ा या वन्यप्राण्यांबरोबरच मगरींचाही लोकवस्तीजवळ वावर आढळू लागला आहे. गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये फोंडा वन्यजीव विभागाने लोकवस्तीजवळ आलेल्या साधारण 38 मगरींना पकडून त्यांची सुरक्षित जागी सुटका केली आहे. मगरीची अशा प्रकारे संख्या वाढणे हे जैविक साखळीच्या संतुलनाच्या दृष्टीने शुभसंकेत नाहीत. त्यासाठी विविध कारणांनी बेसुमारपणे चाललेली घोरपडींची कत्तल थांबणे गरजेचे आहे.
मगरींचा अदिवास आता नाले व ओहोळात
वन्यजीव विभाग तसेच इतर पर्यावरणप्रेमी संस्था गेल्या काही वर्षांपासून घोरपड जगविण्यासाठी जागृती मोहीम राबवित आहे. मगरींची संख्या नियंत्रणात आणणे हेही त्यामागील एक मुख्य कारण आहे. फोंडा तालुक्याविषयी बोलायचे झाल्यास, खांडेपार नदी किंवा तिच्या उपनद्या व जुवारी खाडीत पूर्वी मगरी किंचित दिसायच्या. हल्ली त्या गावातील ओहळ व नाल्यांमध्येही आढळू लागल्या आहेत. फोंडा शहरातून वाहणाऱया मुख्य नाल्यात बेतोडा ते बांदोडापर्यंत ठिकठिकाणी मगरी दृष्टीस पडत असून काही प्राणीमित्रांच्या म्हणण्यानुसार त्या शंभरहून अधिक असण्याची शक्यता आहे. लहान पिल्लापासून किमान 5 ते 6 फुट लांबीच्या मगरीही या नाल्यात प्राणीमित्रांच्या निरीक्षणात आढळून आल्या आहेत. फोंडा वन्यजीव विभागातर्फे वर्षाकाठी किमान 4 ते 5 मगरी पकडल्या जातात. मडकई, उसगाव, बांदोडा, सावईवेरे, खांडेपार भागातील लोकवस्तीजवळ त्या आढळून आल्या आहेत.
गोव्यात सापडणारी मगर निरुपद्रवी
गोव्यात सापडणारी मगर आकाराने मोठी असली तरी ती उपद्रवी मात्र नाही. माणसांवर ती सहसा हल्ला करीत नाही. नदीतील संख्या वाढल्याने हळुहळू तिचा अधिवास जवपासच्या उपनद्या किंवा नाल्यामध्ये सुरु झाला आहे. पाण्यातील मासे, एखादा पक्षी किंवा इतर छोटय़ा जलचरांना त्या आपले भक्ष्य बनवित असतात. प्रजननाच्यावेळी नर व मादी एकमेकांच्या शोधात बाहेर पडतात, तेव्हा चुकून त्या लोकवस्तीपर्यंत पोचतात. घोटमोड उसगाव येथे एका घराजवळ पोचलेली अशीच एक प्रशस्त मगर फोंडा वन्यजीव विभागाच्या रेस्क्यू पथकाने पकडी आहे. तिची लांबी साधारण 3 मिटर तर वजन 1 टनच्या आसपास होते. मडकई येथे स्थानिक मच्छिमारांच्या जाळात अधूनमधून या मगरी अडकतात व वन्यजीव विभागाचे प्राणीमित्र त्यांची सुरक्षित जागी सुटका करतात.
मगरींची वाढणारी संख्या जैविक साखळी संतुलनाच्यादृष्टीने योग्य नाही. घोरपड, अजगर सारखे प्राणी त्यावर नियंत्रण ठेवतात. एक मगर एकावेळी जास्तीजास्त 40 अंडी देतात. घोरपड हा प्राणी ही अंडी शोधून काढीत ती फस्त करतो. अजगर हा प्राणीही मगरीची पिल्ले खात असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण राहते. गेल्या काही वर्षांत शिकार व इतर विविध कारणांनी घोरपडीचे अस्थित्त्व धोक्यात आल्याने मगरीची पिलावळ वाढत आहे. पर्यावरणातील ही जैविक साखळी संतुलीत राहायची असल्यास घोरपडीसारखे प्राणी जगले पाहिजे पाहिजेत, असे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.
पर्यावरणीय जैविक साखळीच्यादृष्टीने चितेंची बाब ः बेतकीकर
फोंडा वन्यजीव विभागाचे अधिकारी दीपक बेतकीकर सांगतात, सध्या गोव्यात आढळून येणाऱया मगरी या माणसांसाठी उपद्रवी नाहीत. माणसांवर त्या सहसा हल्ला करीत नाहीत. पण त्यांची वाढती संख्या ही पर्यावरणीय जैविक साखळीच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणावी लागेल. एका मगरीचे आयुष्य नेमके किती असते या बद्दल आजही प्राणी अभ्यासकांचे एकमत नाही. तरीही ती 60 ते 80 वर्षे जगू शकते असा आजपर्यंतचा निष्कर्ष आहे. मगरीचा आकार 20 फुट लांबी व वजन 1 टनपर्यंत असू शकते. मगरीची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी घोरपड हा प्राणी जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. वन्यजीव विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून घोरपड जगविण्यासाठी विविध माध्यमातून जागृती करीत आहे.
अली व टीमची महत्त्वपूर्ण कामगिरी लोकवस्तीजवळ येणाऱया मगरी, साप व इतर वन्यप्राण्यांना पकडणाऱया फोंडा वन्यजीव विभागाच्या रेस्क्यू पथकामध्ये प्राणीमित्र अली शेख हे महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. वन्यजीव विभागाचे अधिकारी दीपक बेतकीकर यांच्या नेतृत्त्वाखाली या पथकाने गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये 38 मगरींची सुटका केली आहे. त्यांच्या या पथकामध्ये संदेश घाष्टी, अक्षय गावस, सुरेंद्र गावडे, प्रमोद आदींचा समावेश आहे.