हे भाजपाचेच षड्यंत्र : दीपक ढवळीकरांचा आरोप
प्रतिनिधी /फोंडा
मगो-तृणमूल युती अभेद्य असून भाजपासोबत जाण्याचा आमचा कुठलाच विचार नाही. युती तुटणार ही निव्वळ अफवा असून भाजपानेच रचलेले हे षड्यंत्र असल्याचा आरोप मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केला आहे. फोंडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मगो पक्ष तृणमुलशी फारकत घेणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले.
तृणमुलचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मगो पक्षही आज गुरुवारी आपले 12 उमेदवार जाहीर करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी मगो नेत्यांची कुठलीच भेट किंवा चर्चा झालेली नाही. मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठीच अशा खोटय़ा बातम्या पसरविल्या जात असल्याचे दीपक ढवळीकर म्हणाले.
भाजपाविरोधात प्रचंड असंतोष
भाजपाने जनाधार हरवलेला असून बहुतेक मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार पराभूत होण्याचे संकेत मिळतात. निवडणुकपूर्व सर्वेक्षणातून त्यांना नकारात्मक अहवाल मिळाल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच या अफवा पसरविल्या जात आहेत. डिचोली मतदारसंघात सभापती राजेश पाटणेकर यांना आपल्या पराभवाचा अंदाज आलेला आहे. जनतेमध्ये भाजपाविरोधात प्रचंड रोष आहे. जनतेला सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बहुतेक मतदारसंघामध्ये भाजपाची हीच स्थिती आहे.
महागाई, खोटी आश्वासने भाजपाला भोवणार
मागील पाच वर्षात भाजपाने जनतेला निव्वळ आश्वासनांवर झुलविले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना सरकारकडून अद्याप एकही पैसा मिळालेला नाही. महापुरात घरे उद्ध्वस्त झालेल्या लोकांची घरे उभारलेली नाहीत. शेतकरी व बागायतदारांनाही नुकसान भरपाई मिळालेली नाही. गृहआधार सारख्या योजनांचे पैसे सहा महिने रखडत आहेत. महागाई प्रचंड वाढली असून पेट्रोलचे दर शंभर व रसोईच्या सिलिंडरवरील सवलत बंद केलेली आहे. सरकारने गोमंतकीय जनतेला निव्वळ खोटी आश्वासने दिल्याने जनतेच्या मनात भाजपाविरोधात प्रचंड असंतोष आहे. दहा हजार नोकऱया सोडाच उलट नोकऱया विकून सुशिक्षितांवर अन्याय केलेला आहे. त्याची किंमत या निवडणुकीत भाजपाला चुकवावी लागेल. भाजपाने ज्या ज्या मतदारसंघात मगोचे उमेदवार पळविले तेथे जनतेची सहानभूती मिळाली व मगो पक्ष अधिक मजबूत झाला. मगो-तृणमूल युतीचा विजय निश्चित असून आत्तापर्यंत जाहीर केलेल्या सर्व योजनांची पुर्तता सरकार सत्तेवर आल्यानंतर केली जाईल, असा दावाही ढवळीकर यांनी केला.