सुदिन ढवळीकर यांचा दावा
वार्ताहर / मडकई
लाडली लक्ष्मी, गृहआधार व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेला निरंतरपणे मिळण्यासाठी तसेच अभारण्य, रेल्व दुहेरी मार्ग व म्हादई प्रश्नावर मगो पक्षच गोव्याला न्याय देऊ शकेल. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मगो पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे राहण्याचे आवाहन मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. बांदोडा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपा सरकारने संजीवनी साखर कारखान्याच्या शेतकऱयांचे पैसे अडवून त्यांच्यावर अन्याय चालविला आहे. सुमूल डेअरी गोव्यात आणून गोवा डेअरी संपवण्याचा घाट रचला आहे. पावसामुळे शेतीची मोठय़ाप्रमाणात नुकसानी झाली असून सुपारीला लागलेल्या गळतीमुळे बागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे. त्यांना आधारभूत किंमत देण्यास सरकार चालढकल करीत आहे. या सर्व शेतकऱयांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार ढवळीकर यांनी केली. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून इस्पितळात खाटा कमी पडत असल्याने रूग्णांना जमीनीवर झोपावे लागत आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न हाताळण्यात भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टिका त्यांनी केली.
मगो पक्षाने राजकारण करताना नेहमीच नैतिक मुल्यांना महत्त्व दिले. मगोचा एकमेव आमदार म्हणून ताठ मानेने विधानसभेत पक्षाचे असित्व टिकवून ठेवताना अभिमान वाटतो. मगो पक्षाचे पहिले मुख्यमंत्री व गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक प्रकल्प आणले. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या कुठल्याच राजकीय पक्षांना गोमंतकाच्या भवितव्यासाठी एकही नवीन प्रकल्प आणता आलेला नाही. हा इतिहास नजरेआड करून चालणार नाही. उलटपक्षी शेतकऱयांच्या आर्थीक समृद्धीसाठी उभारलेला संजीवनी साखर कारखाना व गोवा डेअरीवर भाजपाने मुळावरच घाव घातल्याचा आरोप त्यांनी केला.