प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा मतदारसंघ हा म.गो पक्षाचा बालेकिल्ला होता. पुन्हा या मतदारसंघात पक्षाचे कार्य विस्तारित करून कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेऊन पुनश्च म्हापसा मतदारसंघ काबिज करण्याचा निर्धार म्हापसा मतदारसंघातील म.गो कार्यकर्त्यांनी अन्साभाट म्हापसा येथे आयोजित केलेल्या बैठकीत केला. व्यासपीठावर बैठकीच्या अध्यक्षस्थानी म.गो गटाचे अध्यक्ष ऍड वामन पंडित, म.गो. म्हापसा युवा अध्यक्ष शुभम तोरस्कर, केंद्रीय समिती सदस्य श्रीपाद येंडे, आमसभा सदस्य एकनाथ म्हापसेकर, प्रेमानंद दिवकर, नंदकिशोर धावस्कर व रमेश मणेरकर उपस्थित होते.
म.गो पक्षाचे राजकारण म्हापसा शहरातून होत होते. पण आज म.गोच्या राजकारणात म्हापशाला योग्य ते स्थान मिळत नाही. त्यासाठी प्रत्येक म.गो कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष कार्य करुया. येणाऱया विधानसभा निवडणुकीत म्हापसा मतदारसंघातून म.गो पक्षाचा उमेदवार विजयी करूया व पुन्हा म्हापसा हा म.गो पक्षाचा बालेकिल्ला करुया असा आजच्या बैठकीत निर्धार करण्याचे आवाहन म.गो गटाध्यक्ष ऍड. वामन पंडित यांनी केले.
केंद्रीय समिती सदस्य श्रीपाद येंडे यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आपण पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचवू व पक्षाध्यक्ष दिपक ढवळीकर व म.गो कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधता यावा यासाठी खास बैठकीचे आयोजन करण्यात येईल. कोरोनाच्या काळात कार्यकर्त्यांची घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला जाईल व त्यांचे विचार पक्षाच्या गतवैभवाला मार्गदर्शन ठरेल असे येंडे म्हणाले.
म.गो युवा अध्यक्ष शुभम तोरस्कर म्हणाले की, मगोच्या चळवळीत युवा शक्ती उतरणार आहे. कुचेली करासवाडा, धुळेर, खोर्ली, अन्साभाट, गावसवाडा, आंगड व मरड भागात म.गो पक्षाची युवा शक्ती वाढविण्यासाठी कार्य चालू झाले आहे व युवकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. असे तोरस्कर यांनी सांगितले.
ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ म्हापशेकर म्हणाले की, भा.जपा राजवटीत पेट्रोल, डिझेल, गॅस सिलींडर वाढले आहे. त्यासाठी सामान्य जनतेमध्ये जागृती केली पाहिजे याचा निषेध आपण केला पाहिजे. या निषेध कार्यक्रमात म्हापशेकारांना सहभागी करून घेऊया अशी सूचना त्यांनी केली. बैठकीत दिवंगत माजी सभापती सुरेंद्र सिरसाट, माजी अमदार स्व. विनायक नाईक, म.गो कार्यकर्ते रामदास फळारी, देविदास (भाई) नाटेकर व माजी नगरसेवक गुरुनाथ नाईक यांची पत्नी दया नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत माजी नगरसेवक नारायण राठवड यांनी दिवंगत झालेल्या नेत्यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. सिरसाट यांनी प्रामाणिकपणाने कार्य केले, सभापती असताना दोन आमदारांना अपात्र ठरवून ऐतिहासिक निर्णय दिला परंतु आजच्या सभापतींना तसा निर्णय राजकरीय दबावामुळे घेता येत नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी संजय (बाबू) विर्नोडकर, लक्ष्मण चव्हाण, विनायक दिवकर, सुदेश डांगी यांनी सूचना मांडल्या. स्वागत नंदकिशोर (नंदू) धावस्कर यांनी केले व म.गो पक्षाच्या गतवैभवासाठी झटण्याचे आवाहन केले.