मगो नेते सुदिन ढवळीकरांचे युतीसंबंधी स्पष्ट संकेत : ‘आप’ने शिरोडा, अन्य ठिकाणी अटी पाळल्या नाहीत
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा तालुक्यातील मडकई, प्रियोळ, फोंडा व शिरोडा या चारही मतदारसंघाबरोबरच सावर्डे, पेडणे, मांद्रे, दाबोळी, मये व डिचोली या मगोच्या हक्काच्या जागा आहेत. त्या सोडून युतीसाठी पुढे येणाऱया पक्षाशींच मगो पक्ष युती करणार आहे. काही ठिकाणी समविचारी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची आमची तयारी आहे, असे मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
वारंवार पक्षांतरे केलेल्या फुटीर आमदारांना उमेदवारी देणाऱया पक्षासोबत मगो कदापि युती करणार नाही, अशी आमची पूर्वअट होती. सुरुवातीला आम आदमी पक्षाशी त्याबाबत आमचे विचार जुळत होते. मात्र आपनेही शिरोडा व अन्य काही मतदारसंघांमध्ये या अटी पाळलेल्या नाहीत, असे सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
राजकारणातील बेशिस्तपणाला चपराक देण्यासाठी व प्रभावी प्रशासनासाठी येणाऱया निवडणुकीत गोमंतकीय जनतेने मगो पक्षाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघासह सावर्डे, पेडणे, मांद्रे, दाबोळी, डिचोली, मये या मतदारसंघामध्ये मगो पक्ष कुठलीच तडजोड करणार नाही. या व्यतिरिक्त इतर मतदारसंघामध्ये एखाद्या चांगल्या पक्षाने युतीसाठी प्रस्ताव ठेवल्यास त्याचा विचार करता येईल, असेही ते म्हणाले.
मूळ भूमिपुत्रांचे प्रश्न आधी सोडवा
मागील दोन विधानसभा अधिवेशनामध्ये मगो पक्षाने मांडलेल्या एकाही मागणीची भाजपा सरकारने पूर्तता केलेली नाही. ग्रामीण भागातील नेटवर्क कनेक्टिविटीत सुधारणा करुन मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्या ही आमची प्रमुख मागणी आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जो राज्यव्यापी दौरा आखलेला आहे, त्यातून मतांची गणिते बांधण्यापेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी असा दौरा करणे आवश्यक होते. पूरग्रस्तांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे दुःख समजून घेण्याची गरज होती. ज्या गरीबांची घरे या महापुरात पूर्णपणे जमिनदोस्त झाली ती दोन लाखांच्या सरकारी मदतीतून उभी होणार नाहीत. त्यांना किमान 50 चौ. मिटरची पक्की घरे उभारून देण्याची जबाबदारी सरकारने उचलायला हवी. त्यासाठी इतर कामातील निधीमध्ये थोडीशी कपात करून गरीब कुटुंबाचे संसार उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. मूळ भूमिपुत्रांच्या जमीन हक्कासंबंधी प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. हे प्रश्न आधी सोडविण्यापेक्षा मतांच्या राजकारणासाठी ज्या लोकांना भूमीपूत्र संबोधून त्यांची घरे नावावर करण्यासाठी चाललेला सरकारचा खटाटोप मूळ भूमीपुत्रांवर अन्याय करणारा आहे, असे ढवळीकर म्हणाले.
संजीवनीमधील 14 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करा
धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या मुद्यावर बोलताना, संजीवनीला रु. 58 कोटी देऊन येथील शेतकऱयांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी या कारखान्यामधील कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सन् 2016 पासून आत्तापर्यंत या साखर कारखान्यात मोठय़ा प्रमाणात आर्थिक घोटाळे झालेले आहेत. गेल्या वर्षी लैला या खानापूर येथील साखर कारखान्याला गोव्यातील ऊस वाहतुकीच्या कंत्राटामध्ये रु. 5 कोटींची अफरातफर झालेली आहे. तसेच त्यापूर्वी उत्पादीत साखरीचे अवमूल्यन करून 15 रु. प्रति किलो याप्रमाणे साखरीचा जो लिलाव झाला त्यातही मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. संजीवनीमध्ये आत्तापर्यंत साधारण रु. 14 कोटींचा आर्थिक घोटाळा झाला आहे, त्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी ढवळीकर यांनी केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खनिज उद्योग सुरु करणे, दहा हजार नोकऱया देणे ही निव्वळ आश्वासने आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर व कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी हे उपस्थित होते.