ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्लीत प्रदूषण एक गंभीर समस्या बनली आहे. दिल्लीतील प्रूदषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. दिवसेंदिवस दिल्ल्ली भोवती प्रदूषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. हवेची गुणवत्ता खूप खालावली आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने दिल्लीच्या प्रदूषणाचा आणि आमचा काही संबंध नसल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने पाकिस्तानमधील प्रदूषित हवेचा परिणाम दिल्लीवर होत असून आमचा याच्याशी काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या खंडपीठासमोर दिल्ली-एनसीआरमधील हवा प्रदूषणावरील याचिकेवर सुनावणी पार पडली. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ रणजीत कुमार यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचं दिल्लीतील प्रदूषणाशी काही देणं-घेणं नसून प्रदूषित हवा दिल्लीच्या दिशेने जात नसल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या बाजूने येणारी हवा दिल्लीमधील हवेवर परिणाम करत प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा केला. यावर सरन्यायाधीशांनी “मग आम्ही पाकिस्तानमधील उद्योगांवर बंदी आणावी असं तुम्हाला वाटत आहे का?” अशी विचारणा केली.