- दसरा मेळाव्यात भाजपचा खरपूस समाचार
ऑनलाईन टीम / मुंबई :
बिहारमध्ये निवडणुकीत सरकार आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. यावर बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांग्लादेशात आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ऑनलाईन दसरा मेळाव्यातून जनतेशी संवाद साधत आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समचार घेतला. पुढे ते म्हणाले, सरकार स्थापन झाल्यापासून मी ऐकतोय सरकार पडेल, सरकार पडेल. आजही मी म्हणतो, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.
ते म्हणाले, मंदिरे का उघडत नाही म्हणून हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जात आहे. पण हे कोण विचारतंय? ज्यावेळी बाबरी पाडली गेली, त्यावेळी आता जे हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारत आहेत. ते त्यावेळेला शेपट्या घालून कोणत्या बिळात बसले होते काय माहिती? यांना त्याकाळी घराच्या बाहेर कुणीही न ओळखणारे आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पुढे ते म्हणाले, एकमेकांना नुसत्या टोप्या घालू नका. टोपी खाली डोकं असेल त्यात मेंदू असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदुत्वाचा अर्थ विचारा. मोहन भागवत जे म्हणाले ते त्यांच्या राजकीय संघटनेनं पाळायला हवं. राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे. विवेक पाळा, असे भागवतांनी म्हटले होते.
- जीएसटी नको, जुनी प्रणाली आणा
जीएसटी फसली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागून जुनी प्रणाली परत आणायला पाहिजे. यावेळी त्यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आपण सर्वांनी पुढे येऊन यावर चर्चा करू असे आवाहनही केले.
- नारायण राणेंवर हल्लाबोल
प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असे विचारले जाते. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या कोरोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचे नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं तुम्हाला माहीत आहेत. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बेडकाला सांगितले की, बाबा वाघासारखा आवाज काढा. बाप आवाज काढतोय पण, तो चिरका येतोय, अशी टीका ठाकरे यांनी केली.
- लगेच बिहारचा पुत्र
कोणी तरी आत्महत्या केली, तर लगेच तो बिहारचा पुत्र झाला. बिहारचा पुत्र म्हणून गळे काढणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या पुत्रावर चिखलफेक केली. ठाकरे परिवार, आदित्यवर टीका केली. तोंडात शेण भरून, गोमूत्राच्या गुळण्या आमच्यावर फेकल्या. आता ते शेण गिळा आणि गप्प बसा. आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही कारण आमचे हात स्वच्छ आहेत.