मुंबई \ ऑनलाईन टीम
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. ‘ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही’ असे लिखीत व्यक्तव्य त्यांनी संसदेत केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राउत यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.
‘ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग, महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात मा.उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलयं. मग, राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीतदरम्यान संजय राउत म्हणाले, “केंद्रीय मंत्र्यांचे ते वक्तव्य ऐकून मी अवाक झालोय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात शेकडो हजारोंचा जीव गेला. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून काय वाटेल ?, तुमचाही खरोखरच विश्वास बसतोय का हे आधी विचारलं पाहिजे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. सरकार खोटं बोलत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल पण सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगाससचा परिणाम आहे. सरकार भ्रमिष्ट झालं आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला.