मुंबई / ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा करत अनिल देशमुख यांची पाठराखन केली आहे. त्यांचा हा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढला आहे. देशमुख क्वॉरंटाईन होते तर त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद कशी घेतली?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी थेट 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला. देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. यातून फडणवीस यांना परमबीर सिंग यांनी केलेला दावा खरा असल्याचं म्हटलं आहे.
परमवीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.