वार्ताहर / किणये
पावसामुळे शिवाजी नगर मच्छे येथील अस्पाक हसनसाब चौस यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. घराची भिंत गुरुवारी पहाटेच्या दरम्यान कोसळली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
गेल्या आठ दहा दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने अस्पाक यांच्या घराची भिंत पाण्याच्या उबळीने पाझरली होती. गुरुवारी पहाटे काही तरी कोसळण्याचा आवाज आल्यामुळे घरातील सदस्य खडबडून जागे झाले व घराबाहेर आले यामुळे मोठी दुर्घटना टळली.
माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील व इतरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अस्पाक यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.