अद्याप कोणताही ठोस पुरावा नसल्याने गूढ वाढले
प्रतिनिधी/ बेळगाव
लक्ष्मीनगर, मच्छे येथील ब्रह्मलिंग मंदिराजवळ शनिवारी दुपारी दोन महिलांचा चाकूने वार करून भीषण खून करण्यात आला होता. घटनेच्या 24 तासांनंतरही या मैत्रिणींच्या खुनाचे गूढ उकलण्यात तपास अधिकाऱयांना यश आले नाही. हा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. त्यामुळे पोलीस अधिकाऱयांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
राजश्री रवि बन्नार (वय 21), रोहिणी गंगाप्पा हुलमनी (वय 32) दोघीही राहणार काळेनट्टी (ता. बेळगाव) असे या दुर्दैवी महिलांची नावे असून रोहिणी ही पाच महिन्यांची गरोदर होती. रविवारी दुपारी काळेनट्टी येथे या दोन्ही महिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार अंत्यसंस्कारांना विरोध झाला. मात्र, गावातील प्रमुखांनी समेट घडविला.
तपासासाठी विशेष पथकाची स्थापना
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या नेतृत्वाखाली दुहेरी खुनाच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. वेगवेगळय़ा अंगांनी खुनाचा तपास करण्यात येत आहे. रविवारी रात्री राजश्री व रोहिणी यांच्या पतींना पोलीस स्थानकात बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
या दोघींनी काळेनट्टी येथील तरुणांबरोबर प्रेमविवाह केला होता. राजश्रीचे माहेर सुळगा (हिंडलगा) येथील तर रोहिणीचे माहेर शिंदोळी येथील असून रोहिणी पाच महिन्यांची गर्भवती होती. डोळय़ात मिरची पूड टाकून या फिरायला गेलेल्या महिलांचा खून करण्यामागची नेमकी कारणे कोणती आहेत? त्यांना संपविण्याची गरज कोणाला होती? याचा तपास करण्यात येत आहे.
रविवारी रात्री तपास अधिकाऱयांशी संपर्क साधला असता तपास सुरू आहे. मात्र, अद्याप ठोस असे धागेदोरे सापडले नाहीत. रवि बन्नार व गंगाप्पा हुलमनी यांच्याकडूनही माहिती घेण्यात येत आहे. त्यांचे कोणाशी वैर होते का? आंतरजातीय विवाहाला कोणी विरोध केला होता का? आदी विविध प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दुहेरी खुनाचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे. रविवारी उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. खून झालेल्या राजश्री व रोहिणी या दोघी आजवर काळेनट्टी येथे राहात होत्या. केवळ पंधरवडय़ापूर्वीच त्यांनी मच्छे परिसरात आपले बस्तान का हलविले? याचाही तपास करण्यात येत आहे.