आंदोलनाद्वारे मागणी : दोन्ही गावांचा नगरपंचायतीमध्ये समावेश केल्याने शासकीय सुविधांपासून वंचित
प्रतिनिधी / बेळगाव
मच्छे-पिरनवाडी गावांचा नगरपंचायतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गावांच्या ग्रामस्थांना शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. विशेषकरून महिलावर्गाला नरेगाअंतर्गत मिळणाऱया रोजगार हमी कामांपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे मच्छे-पिरनवाडी गावांतील नरेगा कामगारांना रोजगार हमीतून कामे मंजूर करा, अशी मागणी मच्छे-पिरनवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी विधानसौधसमोर आंदोलन छेडून केली.
मच्छे-पिरनवाडी ग्रामस्थांना मागील वर्षभरापासून रोजगार हमीची कामे मिळाली नाहीत. त्यामुळे रोजगार कामगारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामस्थांना पूर्वीप्रमाणे रोजगार हमी योजनेतून दीडशे दिवस काम मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोन्ही गावांतील रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱया कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, दोन्ही गावांचा नगरपंचायतमध्ये समावेश झाल्याने ग्रामस्थांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. विशेषकरून ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ही योजना राबविली आहे. मात्र, मच्छे-पिरनवाडी गावांतील रोजगार हमीच्या कर्मचाऱयांना यापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून कामगारांना कामे उपलब्ध करून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली
आहे.