ग्रामस्थांनी केली नगरपंचायतीकडे मागणी : सहा महिन्यांपासून पिण्याचे पाणी नाही : विद्युत पथदीप बंद अवस्थेत : मूलभूत सुविधांपासून वंचित
वार्ताहर /किणये
संभाजीनगर, मच्छे येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. संभाजीनगर हायस्कूल परिसरात पिण्याचे पाणी नाही. पथदीप बंद अवस्थेत आहेत. प्रशासनाचे या नगराकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन संभाजीनगर येथील ग्रामस्थांनी मच्छे नगरपंचायतीला मंगळवारी दिली.
मच्छे ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून ही गावातील नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र संभाजीनगर हायस्कूल परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सहा महिन्यांपासून गल्लीत असलेल्या नळांना पाणीच आले नाही. त्यामुळे टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर काहीजण आजूबाजूला असलेल्या कूपनलिकांचे, शेतशिवारातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी आणत आहेत.
संभाजीनगर हायस्कूल परिसरात एकही पथदीप सुरू नाही. यामुळे इथल्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायतीला वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. मच्छे औद्योगिक वसाहतीच्या बाजूलाच असलेल्या या परिसरात इतक्मया समस्या निर्माण झाल्या आहेत. पथदीप बंद अवस्थेत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी स्थानिक नागरिकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
बंद अवस्थेत असलेल्या कूपनलिकेची दुरुस्ती करून आम्हाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे व या भागातील पथदीप सुरू करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी मच्छे नगरपंचायतीला भागातील नागरिकांनी दिले. नोडल अधिकारी शिवकुमार यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी तुकाराम पाटील, विरुपाक्ष नाईक, माजी सैनिक राजाराम गुरव, माजी सैनिक रामाण्णा कदम, मनोहर लाड, मुत्तू मालशेठ, शिवांगीकर, भैरू होनगेकर, सचिन बेळगावकर आदी उपस्थित होते.निवेदनाचा स्वीकार करून येत्या पंधरा दिवसात संभाजीनगर परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन अधिकारी शिवकुमार यांनी नागरिकांना याप्रसंगी दिले.