भातपिकामध्ये सांडपाणी साचून शेतकऱयांचे नुकसान : तक्रारीची दखल
प्रतिनिधी /बेळगाव
मजगाव परिसरातील सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने कोणत्याच उपाय-योजना राबविल्या नाहीत. परिणामी भातपिकामध्ये सांडपाणी साचून शेतकऱयांचे नुकसान होत असल्याने मनपाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी या समस्येची पाहणी केली. तसेच याबाबत लवकरच उपाय-योजना राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
विविध परिसरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर सांडपाणी नाल्याद्वारे मोठय़ा नाल्याला सोडण्यात आले आहे. मात्र मजगाव परिसरात साचणाऱया सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी उपलब्ध नाहीत. कच्च्या गटारीद्वारे सांडपाणी वाहत आहे. दूषित पाणी शेतवडीमध्ये साचून राहत आहे. त्यामुळे 50 एकरांहून अधिक शेतजमिनीमध्ये सांडपाणी साचून राहिल्याने भातपिकाचे नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी संघटनेच्यावतीने रवि सुप्पण्णावर आणि शेतकऱयांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी मनपाच्या अधिकाऱयांसमवेत या समस्येची पाहणी मंगळवारी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी तसेच शेतकऱयांनी सांडपाण्याच्या समस्येबाबत तक्रारी केल्या.
सांडपाण्यामुळे पिकाचे नुकसान होत असून प्लास्टिकचा कचरा व दूषित पाण्यामुळे जमिनी नापीक होत आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली. यावेळी कच्या गटारीची तसेच सांडपाणी वाहणाऱया परिसराची पाहणी करून गटारीचे बांधकाम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे आयुक्त रुदेश घाळी यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंते सुरेश मुर्त्याण्णावर, स्वच्छता निरीक्षक बोरगावी आदेंसह दीपक सातगौंडा, महिपाल गंगाई, मलसर्ज सनदी, अर्जुन पाटील, राजेंद्र उपाध्ये, संदीप नरसगौडा, पद्मनाथ पाटील व देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष बी. डी. कुडची, पंच शिवाजी पट्टण व इतर शेतकरी उपस्थित होते.