गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूचे थैमान सुरुचः गटारीतील पाणी झिरपून विहिरी दूषित
वार्ताहर / मजगाव
मजगाव येथे डेंग्यूमुळे आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गणपत गल्ली, क्रॉस नं. 1 येथील रहिवासी भागिरथी गंगाराम जायाण्णाचे (वय 71) यांचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे निधन झाले. गेल्या तीन महिन्यांपासून मजगावात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. गेल्या दि. 9 फेब्रुवारी रोजी मारुती गल्ली, मजगाव येथील रेखा पांडुरंग मजुकर (वय 68) यांचाही डेंग्यूनेच मृत्यू झाला होता.
भागिरथी गंगाराम जायाण्णाचे यांना दि. 21 रोजी टिळकवाडीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. 27 रोजी होणार आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्ड नं. 1 मध्ये मजगावचा समावेश आहे. मात्र येथे नागरी सुविधांचा अभाव आहे. गावामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने दूषित पाणी गटारींमध्ये सोडले जाते. त्यामुळे ठिकठिकाणी गटारी तुंबून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावातील अनेक विहिरी दूषित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. गावातील गटारी कचऱयाने आणि प्लास्टिकमुळे तुंबलेल्या आहेत. वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार करूनदेखील याची दखल घेण्यात आलेली नाही.
आरोग्य खात्याचे दुर्लक्ष
वारंवार डेंग्यूबद्दल महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही दखल न घेतल्याने मजगावात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आता देखील शेकडो रुग्ण अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत.
मजगावातील खासगी दवाखाने बंद
गेल्या महिन्यापासून परिसरातील दवाखाने डॉक्टर्सनी कोरोनामुळे बंद केले आहेत. सध्या साधा ताप आला तरी रुग्णांना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.
महानगर पालिकेतर्फे फक्त चार-पाच सफाई महिला कामगार झाडलोट करीत असतात. औषधफवारणी करूनही काहीच परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. आरोग्य खात्याने कायमस्वरुपी दवाखान्याची सोय करावी, अशी ग्रामस्थांकडून जोरदार मागणी होत आहे.