गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांचा आरोप : लवकरच पंतप्रधानांपर्यंत पोहोचविणार घोटाळा
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाच्या संकट काळात बांधकाम मजुरांसाठी घोषित केलेल्या प्रत्येकी 6 हजार रुपयांच्या निधीचा आपल्या कार्यकर्त्यांना लाभ देऊन भाजप सरकारने तब्बल 13 कोटी 15 लाख रुपयांच्या निधीचा घोळ घातल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले जाणार असून लोकायुक्तांनीही या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे. हे 13 कोटी रुपये कुठे गेले याचा पाठपुरावा गोवा फॉरवर्ड शेवटपर्यंत करणार असल्याचेही ते म्हणाले.
खाण घोटाळा प्रकरणाच्या मुद्दय़ावरून हल्लीच लोकायुक्तांनी सरकारवर टीका केली होती. गोव्याला आता देवानेच वाचवणे अशा शब्दात त्यांनी सरकारचा कारभार उघडा पाडला होता. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा घोटाळा पहाता गोव्याला देवही वाचवू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे, असे कामत म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात बांधकाम मजुरांना काम मिळणार नसल्याने केंद्र सरकारने प्रत्येक मजुराला सहा हजार रुपये देणारी योजना जाहीर केली आहे. या योजनेची माहिती हक्क कायद्याअंतर्गत माहिती मिळविणे कठीण असल्याने हा निधी लुटणे सहज शक्य आहे, असा अंदाज करून गोवा सरकारने आपल्या कार्यकर्त्यांना हा निधी वाटला. हा निधी केवळ बांधकाम कामगार किंवा बांधकाम कंत्राटदाराखाली काम करणाऱया मजुरांना मिळायला हवा होता. पण मडय़ाच्या टाळुवरचे लोणी खाण्याची सवय झालेल्या भाजपने मजुरांचा निधीही लुटला, असे कामत म्हणाले.
मजुरांच्या नावाखाली कार्यकर्त्याना वाटली खिरापत
प्रत्येक मजुराच्या खात्यावर सहा हजार रुपये या योजनेंतर्गत मिळायला हवे. पण सरकारने पाच लोकांना प्रत्येकी 9 लाख रुपये दिल्याचे स्पष्ट झाले आहे तर पाच लोकांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले आहेत. या बाबतची माहिती मिळविल्यानंतरच आपण हे आरोप करीत असल्याचे ते म्हणाले. 1948 लोकांना प्रत्येकी 6 हजार रुपये दिले आहेत तर 1444 लोकांना 10 हजार रुपये दिले आहेत. 628 लोकांना प्रत्येकी 20 हजार रुपये तर 300 लोकांना प्रत्येकी 30 हजर रुपये आणि 306 लोकांना प्रत्येकी 40 हजार रुपये दिले आहेत. हा सर्व निधी बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. आपल्या कार्यकर्त्याना याचा लाभ भाजपने दिला, असा आरोपही कामत यांनी केला.
बार्देश तालुक्यात 2270 जणांना लाभ मिळवून दिला आहे. डिचोली 1522, काणकोण 360, धारबांदोडा 620, मुरगाव 40, पेडणे 1890, फोंडा 1890, केपे 370, सालसेत 500, सांगे 405, तिसवाडी 700 आणि सत्तरीत 1300 जणांना लाभ मिळवून दिला आहे.
माहिती मिळविताच अनेक नावे आली समोर
मुख्यमंत्र्यांनी 15 हजार कामगारांना प्रत्येकी 6000 रुपये दिले जातील ही घोषणा केली होती. इतरांना 4000 रुपये दिले जातील, असेही स्पष्ट केले होते. त्यामुळे हे इतर कोण याची उत्सुकता गोवा फॉरवर्डला होती. त्यामुळे याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करताच अनेक नावे समोर आली. महत्वाचे म्हणजे ज्यांची नोंद आहे त्यांना माहितच नाही की आपण अर्ज केला आहे. अनेकांना फोन करून विचारले असता ते कंत्राटदार नसून हेल्पर, चालक, चिकन विकणारा निघाला. एकेका घरातील चार, पाच, दहा जणांची नावे मजूर म्हणून आहेत. मात्र त्यांना यातले काहीही माहित नाही. या पैकी 3880 लोक हे गोव्या बाहेरचे आहेत. डिचोली, सांखळीमध्ये मजुरांची वाढीव संख्या दाखविली आहे. बहुधा तिथे कुणी तरी जास्त जमिनी घेतल्या असाव्या अशी टीकाही कामत यांनी केली.
बँक खाती, आधारकार्ड याची माहिती जुळत नाही. एकूण 13 कोटी 15 लाख 40 हजार रुपये लुटले गेले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही फाईल मागवून घ्यावी नपेक्षा ते अडचणीत येतील. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले जाणार आहे. त्यांनी दखल घेतली नाही तर या घोटाळय़ाला त्यांचीही सहमती आहे, असे होईल. या प्रकरणी लोकांयुक्तांपाशीही तक्रार केली जाईल. तसेच दिल्ली सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.