ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यात अडकलेल्या कामगार आणि मजुरांना मूळ गावी पाठविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी कामगार दिनापासून या सेवेला सुरवात झाली. काल देशातील विविध भागात 6 ‘श्रमिक विशेष’ रेल्वे गाड्या धावल्या.
लॉकडाऊन काळात बंद असलेली रेल्वे शुक्रवारी 40 दिवसानंतर कामगार, मजूर वर्गासाठी धावली. 1200 मजुरांना घेऊन यातील पहिली ट्रेन झारखंडमधील हटिया येथे पोहोचली. हैदराबादजवळील लिंगमपल्ली येथून ही विशेष गाडी सोडण्यात आली होती.
महाराष्ट्रातील नाशिक ते उत्तर प्रदेशमधील लखनऊ, नाशिक ते भोपाळ, राजस्थानमधील जयपूर ते बिहारमधील पाटणा, तेलंगणा ते झारखंड, रांची ते राजस्थान कोटा आणि केरळमधील अलुवा ते ओडिशामधील भुवनेश्वर पर्यंत अशा एकूण 6 ट्रेन काल देशात चालवण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन या वेळी करण्यात आले. या ट्रेनमधील सर्व कामगारांची आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयात तपासणी होणार आहे. यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे.