तंदुरुस्त कामगारांना पाठवण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनामुक्त आणि सुदृढ कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याकरता सरकारने परवानगी द्यावी तसेच त्यांच्या प्रवासाची सोय करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक कामगार परराज्यात अडकुन पडले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत आहे. तेथील राज्य सरकारांकडून मदत मिळत असली तरीही अनेक कामगारांच्या भावना आता तीव्र होऊ लागल्या आहेत. त्यामुळे यातील जे कामगार कोरोनामुक्त असतील, सुदृढ असतील त्यांना काही अटी घालून त्यांच्या गावी परत जाण्याकरता सुविधा निर्माण करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयातही याच विषयाची जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रामुख्याने या परप्रांतीय मजुरांची घरी परतण्याची व्यवस्था केली जावी, अशी मागणी केली आहे.