मनोज पवार/ दापेली
चक्रीवाळामुळे वीजपुरवठा खंडीत झालेल्या मांदीवली गावातील पाणीपुरवठा 21 दिवसानंतर सुरळीत करण्यात एका मजुराने दाखवलेल्या धाडसामुळे यश आले आहे. मांदिवली गावातील रवी दिवा या मजुराने कमरेला दोरी बांधून जनरेटरची केबल पोहत खाडीच्या पलिकडे नेली. त्यामुळे जनरेटरच्या माध्यमातून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे.
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने मांदिवली गावाला पाणी पुरवठा करणाऱया पाणी योजनेच्या जॅकवेलकडे जाणाऱया वीजवाहक तारांवर झाडे पडली. यामुळे मांदिवली गावाचा पाणी पुरवठा बंद होता. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व आमदार योगेश कदम यांनी दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने गावचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 82 केव्ही क्षमता असणाऱया जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. मात्र हा जनरेटर जॅकवेलपर्यंत पोहोचू शकला नाही. यामुळे जनरेटर व पाणी असूनही मांदिवलीवासीयांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल सुरू होते.
गावचा पाणी पुरवठा जनरेटरद्वारे सुरु करण्यासाठी दापोलीचे ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता संजीवन आनंदे व रत्नागिरी यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता दयानंद परवडी यांनी मांदिवली गावची पूर्ण पाहणी केली. मात्र गावातून कोणत्याही प्रकारे जनरेटर विहिरीपर्यंत पोहोचवणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा जनरेटर मंडणगड तालुक्याच्या हद्दीत असणाऱया चिंचघर शेवरे रस्त्यालगत एका झाडाखाली उभा करण्यात आला. या झाडापासून पलिकडच्या बाजूला दापोली तालुक्यातील मांदिवली नळपाणी योजनेचे पंप हाऊस दिसत होते. मात्र जनरेटर व पंप यामध्ये जंगल व भली मोठी भारजा नदी होती.
अखेर गावातील शेखर वेदपाठक यांच्याकडे मजुरीचे काम करणाऱया रवी दिवा यांना आनंदे यांनी नदीपलीकडे केबल पोहचवण्याची विनंती केले. गावचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याने रवी दिवानेही त्यासाठी तयारी दर्शवली. जनरेटरपासून जंगलातून वाट काढत हे सर्वजण भारजा नदीच्या किनाऱयाला पोहोचले. येथे पोहोचल्यावर रवी दिवा यांच्या कंबरेला मोठा दोरखंड बांधण्यात आला. यानंतर त्याने नदीत उडी मारून पोहत खाडी पार केली व पलिकडच्या झाडाला जाऊन दोरीचे एक टोक बांधले. दुसऱया टोकाला आनंदे यांनी जनरेटरची केबल बांधली. रवी दिवा याने दोरीने केबल ओढून येथील एका झाडाला बांधली. यानंतर पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱयांनी ही केबल दोन्ही झाडांना खाडीच्या पाण्याच्या पात्रापासून वरच्या बाजूला बांधून जॅकवेलपर्यंत वीज पोहचवत मांदिवली गावचा पाणी पुरवठा सुरळीत केला.
रवी दिवा याची दुसरी कामगिरी
गेल्यावर्षी याच नळपाणी योजनेचेचा पंप दोरी तुटून विहिरीत पडला होता. यावेळी विहिरीला तब्बल 25 फूट पाणी होते. तेव्हाही आनंदे यांनी रवी दिवा यास विनंती केल्यावर त्याने विहिरीमध्ये उडी मारून अवजड पंप बाहेर काढला होता, अशी माहिती संजीवन आनंदे यांनी यावेळी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.