वार्ताहर/भवानीनगर
पंढरपूर येथे मठाधिपदी पद सोडण्याच्या कारणावरुन खून झालेल्या जयवंत महाराज पिसाळ (34) यांचा मृतदेह बुधवारी पहाटे कराड येथे व तिथून सकाळी दहा वाजता त्यांच्या मुळगाव वाळवा तालुक्यातील लवंडमाची येथे आणण्यात आला. टाळमृदुंगाच्या गजरात आणि सजवलेल्या ट्रॉली मधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्यावर कराड तासगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पिसाळ व बाजीराव बुवा जगताप यांच्यात मठाधिपती होण्यावरुन गेल्या काही वर्षापासून वाद होता. कराड येथील मारुतीबुवा कराडकर यांचा पंढरीतील झेंडे गल्लीत मठ आहे. यामठाचे बाजीरावबुवा हे पुर्वी मठाधिपती होते. त्यांनतर जयवंत महाराज पिसाळ यांची निवड झाली. या पदाच्या स्पर्धेतूनच बाजीरावबुवाने मंगळवारी दुपारी जयवंतबुवा हे मठात बसले असताना चाकूने हल्ला करुन खून केला.
या दोघांमध्ये गेल्या दीड वर्षापासून वाद होता. हा वाद पोलीस ठाणे व न्यायालया पर्यंत गेला होता. मठाच्या विश्वस्तांनी बाजीराव याची मठाधिपती म्हणून नेमणूक झाली नसल्याच्या युक्तीवाद केला होता. त्यास बाजीरावने धर्मदाय आयुक्तांकडे आव्हान दिले होते. मठात प्रवेश करण्यावरुन बाजीराव व विश्वतांमध्ये वाद होता. विश्वस्तांनी आपली वर्तणूक वारकरी सांप्रदायाला साजेशी करा, असा सल्ला त्याला दिला होता. त्यातून एप्रिल 2019 मध्ये जगताप यांने विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष यशवंत दाजी माने(80) यांच्या डोक्यात विणा घालून त्यांना मारण्याचा प्रकार ही केला होता. त्यावेळी त्याला अटक ही झाली होती. त्या गुह्यातून जगताप हा जामिनावर बाहेर आहे. एकादशी, द्वादशीला मोठे महत्व असून याच दरम्यान हा खून झाल्याने पंढरीत खळबळ उडाली.
वयाच्या चौतिसावा वर्षी पंढरपूर आणि कराड येथे मठ आणि मिळकत असणाऱया आणि वारकरी संप्रदायमध्ये आदराचे स्थान असणाऱया मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती होण्याचा मान जयवंत महाराज पिसाळ यांना मिळाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत व इयत्ता दहावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण भवानीनगर येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयात झाले. वडील हिंदूराव पिसाळ त्यांच्या धार्मिक वृत्तीचे आहेत. जयवंत महाराजांनी दहावीनंतर शिक्षण बंद करून आळंदी येथे राहून वारकरी संप्रदायाचे शिक्षण पूर्ण केले. बंडातात्या कराडकर यांनी त्यांच्या धार्मिक आणि वारकरी संप्रदायाचा ओढा पाहून त्यांना मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती नियुक्त केले होते.
जयवंत मृतदेह बुधवारी सकाळी लवंडमाची येथे आणण्यात आला. त्यावेळी वडील हिंदूराव पिसाळ व आई यांचेसह विवाहित बहीण अलका सावंत व भाऊ शहाजी यांना हबंरडा फोडला. या घटनेने ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे. बंडातात्या कराडकर यांचे उपस्थितीमुळे मोठा पोलीस बंदोबस्त होता. रक्षा विसर्जन विधी शुक्रवारी दि. 10 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.