चतुर्थीपूर्वी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
प्रतिनिधी /फोंडा
कुंडई व मडकई भागात गेल्या महिन्याभरापासून व्यवस्थीत पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी काल मंगळवारी सकाळी दाग फोंडा येथील पाणी विभागाच्या कार्यालयावर मार्चा आणला. साहाय्यक अभियंत्यांकडून त्याविषयी स्पष्टीकरण मागण्यात आले.
मडकई नागरिक कृती समितीचे सदस्य तसेच कुंडईतील काही ग्रामस्थांचा त्यात समावेश होता. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मागील महिन्याभरापासून मडकई गावात व कुंडईतील काही भागांत दिवसाकाठी केवळ अर्धा तास नळांना पाणी येते. हे पाणी टॉयलेटच्या वापरासाठीही पुरत नाही. मडकईतील औद्योगिक वसाहतीमध्ये मात्र चोवीस तास पाणी पुरवठा होतो. घरातील पाण्याची गरज भागविण्यासाठी काही लोकांना मागील काही दिवसांत छप्परावरून गळणाऱया पावसाचे पाणी वापरावे लागले. साहाय्यक अभियंते यशवंत मापारी यांनी पाण्याच्या या समस्येवर येत्या 5 सप्टेंबर पर्यंत तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तपोभूमी कुंडई येथील 300 क्युबीक मीटरच्या पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीकाम सुरु असल्याने मडकई व कुंडई भागात सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकत नाही, असे अभियंते मापारी यांनी सांगितले. याच टाकीतून कुंडई व मडकईत पाणी पुरवठा केला जातो. हे काम शनिवारपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल.