वार्ताहर/ मडकई :
मडकई व कुंडई भागातील पाणी पुरवठय़ामध्ये अडथळा ठरणाऱया तांत्रिक गोष्टींचा पाठपुरावा करुन त्यासंबंधी अभियंत्याशी चर्चा केली आहे. येत्या दोन तीन दिवसांत मडकईतील पाणी पुरवठय़ात सुधारणा होईल, अशी माहिती स्थानिक आमदार तथा माजी बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली आहे. गेले वर्षभर पाण्यासाठी नागरिकांना हाल सोसावे लागले. कुंडई भागात आठशे क्युबिक क्षमतेची पाण्याची टाकी बांधून या भागातील पाणी पुरवठय़ात सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
मडकईचे पंचायतीचे पंचसदस्य शैलेंद्र पणजीकर, विशांत नाईक, दीपा नाईक, लक्ष्मी तारी, अभियंते निवृत्ती पार्सेकर, कनिष्ठ अभियंते तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते. गेले वर्षभर आडण, आक्सण, टोंक मडकई व वडाळ भागात पाणी पुरवठय़ात समस्या होती. उंचावरील व सखल भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नव्हता. पाणी विभागाच्या अभियंत्यासह सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी या भागात पाहणी केली. या पाहणी दरम्यान पुरवठय़ामधील दोष लक्षात आले आले असून यापुढे दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तपोभूमी कुंडई व मडकई औद्यागीक वसाहतीजवळ ज्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत, त्यांची क्षमता तिनशे क्युबिक आहे. त्यावेळी येथील लोकांच्या गरजेनुसार त्या बांधण्यात आल्या होत्या. लोकसंख्या व पाण्याची गरज वाढल्याने कुंडई भागात आठशे क्युबिक क्षमतेची आणखी एक टाकी बांधण्यात येईल. जीआय पाईपलाईन टाकून रु. 2.50 कोटीचा हा प्रकल्प उभारला जाईल. त्यासाठी निविदाही काढलेली आहे. काही सोपस्कार पूर्ण न झाल्याने विलंब झाला. ही पाण्याची टाकी बांधल्यानंतर पाण्याचा दाब वाढेल व मडकईत पुरेसा पुरवठा होईल. मडकई येथील मैदानाच्या सुशोभीकरणाचे हाती घेण्यात आले होते. विविध सुविधा असलेल्या या मैदानाचे काम मंदावले आहे.
वडाळ, आडण व आक्सण या भागातील नागरिकांनी पाण्याच्या समस्येवर बोलताना सांगितले की, गेले वर्षभर पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहे. आमदार ढवळीकर मंत्रीपदी असताना अशी समस्या कधीच जाणवली नाही. यावरुन सरकारची कार्यपद्धती सामान्य माणसाच्या लक्षात येते.
पाण्याची समस्या केवळ मडकईतच नव्हे तर प्रत्येक मतदारसंघात आहे. आपण मंत्रीपदी असताना प्रत्येक खात्याला व्यवस्थीत न्याय दिला. पाण्याच्या समस्येवर अभियत्यांशी चर्चा करुन तातडीने उपाययोजना केल्या जात. सध्य स्थितीत सरकारमध्ये अनुभवी मंत्री नसल्याने अनेक समस्या जनतेला भेडसावू लागल्या आहेत. फोंडा तालुक्यात आपो येथे 27 एमएलडी, मैसाळ येथे 15 एमएलडी याशिवाय सांगे प्रकल्पातून 10 एमएलडी पाणी फोंडा तालुक्यात वळविले जाते. त्यामुळे फोंडा तालुक्याला 50 एमएलडी पाणी मुबलक प्रमाणात मिळते. पाणी पुरवठय़ातील तांत्रिक गोष्टी लक्षात घेऊन अभियंत्याशी चर्चा केल्यास समस्या सुटू शकतात, असे ढवळीकर म्हणाले.
तर शेतकरीच सरकारला धडा शिकवतील…
भाऊसाहेब बांदोडकरांनी शेतकऱयांचे हित लक्षात घेऊन संजीवनी साखर कारखाना उभारला होता. सरकारने तो बंद केल्यास शेतकरीच सरकारला धडा शिकवतील. आजपर्यंत कुठल्याही सरकारने शेतकऱयांच्या हिताविरोधात निर्णय घेतला नाही. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शेतकऱयांचे हित जपले. गोव्यातील भाजप सरकारमात्र शेतकऱयांना न्याय देऊ शकत नाही. काही कोटी रुपयांची नुकसानी सोसावी लागते म्हणून कारखाना बंद करणे योग्य नाही. आपण शेतकऱयांच्या पाठिशी असून सरकारला आपला निर्णय बदलावा लागेल असे ढवळीकर म्हणाले.
व्हीपीके अर्बनवर आर्थिक निर्बंध घालणे चुकीचे
व्हीपीके अर्बनची आर्थिक स्थीती मजबूत असताना या संस्थेवर आर्थिक निर्बंध घालणे चुकीचे आहे. संस्थेपाशी 750 कोटीच्या ठेवी आहेत, 450 कोटीचे कर्ज वितरीत केलेले आहे, 200 कोटीची गुंतवणूक आहे. राखीव फंडही 200 कोटींचा आहे. शेतकऱयांना 50 हजारापर्यंत कर्ज देताना संस्था कुठलेच तारण घेत नाही. संस्थेचे संचालक मंडळ उत्कृष्ट काम करीत आहे. ही संस्था गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत देते. समाजाच्या हितार्थ काम करण्याऱया अशा संस्थावर आर्थिक निर्बंध घालणे चुकीचे आहे. सहकार मंत्र्याना सहकारी संस्थाचे हित जपता येत असल्याचे हे परिणाम असल्याची टिकाही ढवळीकर यांनी केली. सहकार मंत्र्यांना आपल्या खात्याविषयी काही कळत नसल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.