प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात सकाळी 9 नंतर मासळी विक्रीला बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी घातल्यापासून स्थानिक मासळी विक्रेत्या महिलांना अनेक समस्यांचा सामना करणे भाग पडू लागले आहे. या महिलांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. मात्र, मुख्यमत्र्यांकडून त्यांना ठोस असे आश्वासन मिळाले नाही.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावच्या घाऊक मासळी मार्केटला भेट देऊन पाहणी केली होती व या ठिकाणी होत असलेली दुर्गंधी व वाहतूक समस्या लक्षात घेऊन हे मासळी मार्केट सकाळी 9 नंतर बंद करावे असा आदेश दिला होता. त्यानंतर मार्केट सकाळचे 9 वाजता बंद केले जात असून या ठिकाणी कोणताच व्यवहार करता येत नाही. पण, गेल्या कित्येक वर्षापासून या घाऊक मासळी मार्केटात मासे घेऊन येणाऱया स्थानिक मासळी विक्रेत्या महिलांवर अन्याय होऊ लागला आहे.
स्थानिक मासळी विक्रेत्या महिला रापण तसेच खाडीतील मासळीची या ठिकाणी विक्री करतात. बऱयाच वेळा सकाळी 9 नंतरच रापणीचे तसेच इतर स्थानिक मासे या महिलापर्यंत पोचतात, त्यामुळे मासे विक्री कुठे करावी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी पर्यायी जागा उलपब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. पण, पर्यायी जागा न देताच पुन्हा घाऊक मासळी मार्केटात मासे विक्री करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी लावून धरली आहे.
लमाणीवर बंदी घाला
या घाऊक मासळी मार्केटात अनेक लमाणी मासे खरेदी-विक्री व कापणीचा व्यवसाय करीत असून त्यांच्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याने, त्यांना घाऊक मासळी मार्केटमध्ये बंदी घालावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी देखील या मार्केटात अस्वच्छता होत असल्याचे मान्य करताना, मासळी विक्रीचा व्यवसाय लमाणीच्या हातात जाण्याची शक्यता व्यक्त केली.
आपण, स्थानिक मच्छीमार महिलांचा प्रश्न एसजीपीडीएसमोर मांडून योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव उपस्थित होते, त्यांनी देखील स्थानिक मासळी विक्रेत्या महिलांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे अशी विनंती केली.