केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे आवाहन
प्रतिनिधी /मडगाव
भाजप सरकारनेच गोव्याचा सर्वागिण विकास केला. त्यात स्व. मनोहर पर्रीकर यांचे योगदान कुणीच विसरू शकत नाही. आज मडगाव शहराचा विकास साध्य करण्यासाठी या ठिकाणी परिर्वतन करण्याची गरज आहे व त्यासाठी मडगावातील जनतेने भाजपला साथ द्यावी असे आवाहन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
मडगाव मतदारसंघातील भाजपच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी मडगाव मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार डॉ. जगन्नाथ उर्फ देश प्रभुदेसाई, मडगाव भाजप मंडळाचे सरचिटणीस सुनील कृष्णनाथ नाईक, पक्षाचे कार्यकर्ते शर्मद पै रायतूरकर, नवीन पै रायकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व परिस्थितीला तोंड मडगावातील भाजपचे कार्यकर्ते पक्षासोबत ठामपण राहिले आहेत. त्याचा चांगला परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येईल. प्रथम देश, नंतर पक्ष आणि त्यानंतर कायकर्ता हे भाजपची भावना असून या भावनेतूनच भाजपचे संघटन मजबूत झालेले आहे. 1986 सालापासून अनेक युवा कार्यकर्ते भाजप सोबत जोडलेले गेलेले आहेत. त्यानतंर राज्यात तीन वेळा भाजपचे सरकार सत्तेवर आलेले आहे. 4 आमदारांवरून पक्षाची सुरवात झाली होती. त्यानंतर 18 आमदारांपर्यंत पक्षाने मजल गाठली. 18 वरून 25 आमदार झाले. हा सर्व इतिहास कार्यकर्त्यांना ठावूक आहे. भाजपला सत्ता दिल्यानंतर त्यांचे चांगले परिणाम दिसून आले.
मनोहर पर्रीकर यांनी धडाधडीने गोव्याचा विकास केला
गोव्यात भाजपने कशा पद्धतीने विकास केला हे सर्वांना ठावूक आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांनी धडाधडीने गोव्याच्या विकासासाठी जे कार्य केले ते अद्वितीय आहे आणि त्याचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सुरवातीला लक्ष्मीकांत पार्सेकर नंतर आत्ता डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याला विकासाच्या मार्गावर नेत आहे. भाजप व विकास हे जणू समिकरण झालेले आहे. देशभरात मोदी सरकारने कशा पद्धतीने विकासांची कामे पुढे नेली आहेत. याची जाणीव जनतेला आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन विचार व सर्वांना सोबत घेऊन भाजप आपली वाटचाल करीत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱया निवडणुकीत गोव्यातील जनता पुन्हा एकदा भाजपला सत्तेवर आणणार यात कोणतीच शंका नसल्याचे उद्गार यावेळी श्रीपाद नाईक यांनी काढले.
इतर पक्षांकडून खोटी आश्वासने
गोव्यात आज नवनवीन पक्ष येत आहे व आपले मॉडेल वापरण्याची भाषा करतात. पण, गोव्यात भाजपने कशा पद्धतीने कार्य केले आहे याची जाणीव त्यांना नाही. गोव्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत. आज गोव्यात लिलाव केल्या प्रमाणे नवीन पक्ष योजनाच्या घोषणा करतात. ही खोटी आश्वासने असून या आश्वासनाला जनतेने बळी पडू नये असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी यावेळी बोलताना केले.
श्रीपाद नाईक व पर्रीकर हे आपले मार्गदर्शक
1991-92च्या दरम्यान भाजपने कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण केली. त्यावेळी आपल्याला श्रीपाद नाईक व स्व. मनोहर पर्रीकर यांचे मार्गदर्शन लाभले. पक्षाने त्यावेळी दिलेली जबाबदारी पूर्ण केली. कार्यकर्त्याच्या बळावर पक्षाने निवडणूक लढविली व पक्षाचे उमेदवार निवडून आले. आत्ता पक्षाने पुन्हा एकदा आपल्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे ती मडगाव मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची आणि त्यासाठी पहिले पाऊल टाकताना, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणले जाईल व त्या अनुषंगाने पक्षाचे कार्यालय सुरू करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे संभाव्य उमेदवार डॉ. देश प्रभुदेसाई यांनी दिली.
‘माझे’ मडगावच्या ऐवजी ‘आमचे’ मडगाव करायचेय
मडगावात एक प्रथा झालेली आहे ती ‘माझे’ मडगाव म्हणण्याची, आम्हाला ती बदलून ‘आमचे’ मडगाव करायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवीच, त्याच बरोबर आपण सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याचे डॉ. देश प्रभुदेसाई यांनी सांगितले.