प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात अडकलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या 31 विद्यार्थ्यासहीत 721 प्रवाशांना घेऊन श्रमित ट्रेन काल सोमवारी रात्री 9 वाजता जम्मू-काश्मिरकडे रवाना झाली. यात बेळगांवमध्ये अडलेल्या 8 जणांचाही समावेश होता. या प्रवाशांना निरोप देण्यासाठी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर उपस्थितीत होते.
गोव्यात अडकलेल्या जम्मू-काश्मिरमधील लोकांना परत पाठविण्याची तयारी काल रविवारपासून सुरू झाली होती. आज सकाळी 6 वाजता सर्व अधिकारी फातोर्डा स्टेडियमवर उपस्थित झाले होते व अखंडितपणे या कामात गुंतले होते अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. रॉय यांनी दिली. जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी गोव्यात अडकून पडले होते. त्यांना परत पाठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू हाते. अखेर काल या विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले.
ही श्रमिक रेलगाडी जम्मू-काश्मिर व उधमपूरला जाणार आहे. नंतर उधमपूरहून पुढील प्रवासी बसमधून लडाकला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिली. उधमपूर रेल्वे स्थानकावर तेथील अधिकाऱयांनी त्यांच्यासाठी बससची व्यवस्था केल्याची माहिती देण्यात आली.