प्रतिनिधी/ मडगाव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2 पासून ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी अग्निग्नशामक दलाने मडगावात मोहीम हाती घेतली. मात्र सदर निर्जंतुकीकरण मोहीम मडगावातील गांधी मार्केट व न्यू मार्केट तसेच अन्य बाजारपेठांमध्ये राबविण्याची मागणी नागरिकांकडून उचलून धरण्यात आली आहे.
शुक्रवारी मडगाव पालिका चौक तसेच सिने लताजवळील रस्ते, पदपथांवर रसायनमिश्रित पाणी फवारून निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली असली, तरी त्याची खरी गरज मडगाव पालिका क्षेत्रातील बाजारपेठांमध्ये असल्याचे मत व्यक्त होत आहे. या बाजारपेठ भागांना जास्त लोकांनी भेटी दिलेल्या आहेत. मडगाव पालिकेने आवश्यक रसायन विकत घेतले असून ते अग्निग्नशामक दलाला देऊन निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. मडगाव पालिकेचे अभियंते व अधिकारी शुक्रवारी सदर मोहिमेदरम्यान उपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले.
अधिकाऱयांनी मोहीम हाती घेतली गेली हे दाखविण्यासाठी सोशल मीडियावर छायाचित्रे टाकून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यापेक्षा सदर निर्जंतुकीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन आखण्याची व त्यातून मूळ उद्देश साध्य होणार याकडे लक्ष देण्याची गरज एका नगरसेवकाने व्यक्त केली.
अग्निग्नशामक दलावर मडगावसहित सासष्टीतील अन्य पंचायत क्षेत्रांतील निर्जंतुकीकरणाची जबाबदारी असल्याने मडगाव पालिकेने बाजारपेठांतील अंतर्गत भागांमध्ये जेथे विक्रेत्यांचा व ग्राहकांचा जास्त वावर होता तेथे अग्निग्नशामक दलाची वाट न पाहता कामगारांची पथके तयार करून हँडपंपद्वारे रसायनाची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.