केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचा दावा
प्रतिनिधी /मडगाव
मडगावात दर निवडणुकीत भाजप कार्यकर्तांमध्ये दुफळी आढळून येते, त्यामुळे मडगाव मतदारसंघात भाजपला यश प्राप्त करता आलेले नाही. मात्र, यावेळी अशी कोणतीच दुफळी मडगावात निर्माण होणार नाही. भाजपचे जे काही कार्यकर्ते दुरावले आहेत. त्या सर्वांना एक आणून सर्वजण एकत्र राहून पक्षाला विजय मिळवून देतील असा विश्वास केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
भाजपे सद्या जे सर्वेक्षण केले आहे. त्यात भाजपला कोणत्या मतदारसंघात यश मिळू शकते याचा अंदाज बांधण्यात आलेला आहे. त्यात मडगाव मतदारसंघाचा समावेश झालेला नाही. हे अंतर कसे भरून काढणार असा सवाल केला असता, श्रीपाद नाईक म्हणाले की, आज सर्व जुने व नवे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत व जेव्हा कायकर्ते पेटून उठतात तेव्हा मतदारसंघ जिंकण्यात यश येते आणि त्याच पद्धतीने हा मतदारसंघ काबीज केला जाणार असल्याचे श्री. नाईक म्हणाले.
……ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेदचे 15 ऑगस्टला उद्घाटन….
धारगळ-पेडणे येथे ‘ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद’ चे बांधकाम सुमारे 2 लाख चौरस मिटर जागेत केले जात असून हे काम 60 ते 70 टक्के पुर्ण झाले असून येत्या 15 ऑगस्ट रोजी या इन्स्टिटय़ूटच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचा संकल्प केल्याची माहिती केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. 100 खाटांचे हॉस्पिटल तसेच 100 विद्यार्थ्यांचे पदवीपूर्व महाविद्यालय, 60 विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर महाविद्यालय तसेच संशोधन केंद्र सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दुसऱया टप्प्यात योगा आणि निसर्गोपचार वर भर दिला जाईल. त्यात 100 खाटांची व्यवस्था तसेच संशोधन केंद्राला प्राधान्य दिले जाणार आहे. सद्या ‘ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद’चे काम युद्ध पातळीवर सुरू असून ते निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल असे श्रीपाद नाईक म्हणाले. दक्षिण गोव्यात मोती डोंगरावर आयुर्वेद हॉस्पिटलचे काम सुरू असून ते सुद्धा लवकर जनेतच्या सोयीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली. कालच केंद्रीय आयुष्यमंत्रालयाला उपसंचालक मिळाला असून त्याच्या मार्फत गोव्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली जाणार आहे.
विदेशातील काळे धन आणण्याची प्रक्रिया सुरू
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील अशी घोषणा केली होती. हय़ा घोषणेचे काय झाले असा सवाल उपस्थित केला असता श्रीपाद नाईक म्हणाले की, विदेशातील बँकांनी जी गुंतवणूक करण्यात आली होती, त्यातील सर्व पैसे हाती लागले तर प्रत्येकाच्या वाटाल्या 15 लाख रूपये येतील, याचा अर्थ ते 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील असा होत नाही. विदेशातील बँकांनी गुंतवणू केलेले पैसे परत आणण्यासाठी कित्येक प्रयत्न झालेले आहेत. काही खातेधारकांची नावे सरकारच्या हाती आलेली आहे. त्यांच्यावर जी काही कारवाई करायची होती ती व्यवस्थितपणे करण्यात आलेली आहे. काही देशामध्ये जे करार झालेले आहेत. त्यात अडचणी येत आहे. संपूर्ण माहिती मिळत नसल्याने गुंतवणूक केलेले पैसे परत मिळविण्याची प्रक्रीया जरा धीम्या गतीने होत असले तरी पैसे मिळविण्याचे काम सुरू असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.
मडगाव व्यावसायिक राजधानी कायम ठेवण्यास प्राधान्य मडगाव शहर हे व्यावसायिक राजधानी म्हणून ओळखली जाते. ही ओळख कायम ठेवतानाच येथील व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे मत यावेळी संभाव्य उमेदवार डॉ. देश प्रभुदेसाई यांनी मांडले. आज मडगाव शहरातील अनेक व्यवसाय हे इतरत्र स्थलांतरीत होत आहे. त्याचा परिणाम या शहरावर होताना दिसतो. येथील व्यावसायिक धंदा होत नसल्याने नाराज आहे. त्यांच्या समस्या जाणून घेतानाच, त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज शहरात पार्किग समस्या गंभीर आहे. ती सोडविणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.